नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज



संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज

जन्म : ८ डिसेंबर १६२४ ( सदुंबरे, मावळ, पुणे, महाराष्ट्र )
निधन : १६८८
वडील : विठोबा जगनाडे
आई : माथाबाई

हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.

💁‍♂ *बालपण*
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यां पैकी एक झाले.

🔱 *विवाह*
संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.

☯ *गुरुभेट*
त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.

✒ *गाथांचे पुनर्लेखन*
संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.

⏳ *इहलोकाचा त्याग*
शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. परंतु तुकाराम हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.
संताजी जगनाडे ऊर्फ संतू तेली यांनीही तुकारामाप्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत, त्यांपैकी काही हे :-

📝 *संताजी महाराजांचे अभंग*
★☆ *संत श्री संताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग* ☆★

》》》भाग-1《《《

{क्र. 1 }

माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। 1 ।। माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।। 2 ।। संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।। 3 ।।

{अभंग क्र. 2}

एकादशी दिनी संतु तुका वाणी ।

राऊळा आंगणी उभे होते ।। 1 ।।

तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।

पांडुरंग चरणा नमियेले ।।2।।

तेथुनी तो आला तुका जेथे होता ।

अलिँगन देता झाला त्याशी ।।3।।

तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।

सांगतो तुजला संतु म्हणे ।।4।।

{अभंग क्र.-3}

तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे ।

किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। 1 ।।

काय तुझ्या मागेँ कोण तुज सांगे ।

काय ते अभंग जाणितले ।।2।।

घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।

जन्म पाठिमागा का गेला ।।3।।

तुका म्हणे सर्व सांग तु मजला ।

सांगतो तुजला संतु म्हणे ।। 4

{अभंग क्र.-4}

मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही ।

आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। 1 ।।

होईल मज आणि माझिया कुळांशी ।

पांडुरंग मुळाशी सर्व आहे ।। 2।।

संतु म्हणे ब्रम्ह ब्रम्हा सर्व जाणे ।

आपुले ते मन सुधारले ।। 3 ।।

{अभंग क्र.- 5}

भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।

जाणे उठा उठी देवराया ।। 1 ।।

भक्ति या भावाची करुनिया लाट ।

आलिंगितो तीस राञंदिन ।। 2 ।।

संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद ।

द्यावा वारंवार मजलागी ।। 3 ।।

》》》भाग-2《《《

{क्र.6}

मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा ।

मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर।।1।।

मज मागे घेवदेव सांगे रुक्मिणीचा राव ।

मज मागे निद्रा आहार सांगे उमा सारंगधर ।।2।।

किर्तीविणा कांही मागे ते राहिना ।

संतु सांगे खुणा तुकयाशी ।।3।।

{क्र.7}

ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग ।

देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ।।1।।

त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाही ।

प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी ।।2।। संतु म्हणे असा अंभग गाइला ।

पुढे चालु केला देहावरी ।।3।।

{क्र.8}

जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही ।

निरंजन निराकार आधार नव्हता ठाई ।।1।।

तेथे मी जन्मलो शोधुनिया पाही ।

जन्मले माझे कुळ आशेच सर्वही ।।2।।

असाच हा जन्म पाठी मागा गेला । पुन्हा नाही आला कदा काळी ।।3।।

संतु म्हणे वनमाळी ।

चुकवा जन्माची हे पाळी ।।4।।

{क्र.9}

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो ।

तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।1।।

नाही तर तुमची आमची एक जात । कमी नाही त्यात आणु रेणु ।।2।।

संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।

स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।3।।

{क्र.10}

आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा ।

नंदी जोडियला मन पवनाचा ।।1।।

भक्ति हो भावाची लाट टाकियली ।

शांती शिळा ठेवीली विवेकावरी ।।2।।

सुबुध्दीची वढ लावोनी विवेकांस ।

प्रपंच जोखड खांदी घेतीयले ।।3।।

फेरे फिरो दिले जन्मवरी ।

तेल काढियले चैतन्य ते ।।4।।

संतु म्हणे मी हे तेल काढियले ।

म्हणुनी नांव दिल संतु तेली ।।5।।


》》》》भाग - 3《《《《

{क्र.11}

देह क्षेञ घाणा ऐका त्याच्या खुणा ।

गुदस्थान जाणा उखळ ते ।।1।।

स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र ।

विदुं दंत चक्र आनु हात ।।2।।

एकविस मनी खांब जो रोविला ।

सुतार तो भला विश्वकर्मा ।।3।।

मनाशी जुपंले फेरे खाऊ दिले ।

तेल हाता आले सुटे मन ।।4।।

संतु म्हणे माझा घाणा हो देहांत ।

चालवि आपोआप पांडुरगं ।।5।।

{क्र.12}

निंदक हा घाणा म्हणावा तो जरी ।

विवाहा भितरी फिरे कैसा ।।1।।

ब्राम्हण पुरोहित आणिक ते जोशी ।

भरा आधी घाणा म्हणती सर्वाशी ।।2।।

भरल्यावांचुनी कार्य सिध्दी नाही । शोधुनिया पाही संतु म्हणे ।।3।।

{क्र.13}

निदंक हा घाणा म्हणावा तो जरी ।

शुभ कार्या आधिं भरतात ।।1।।

श्रीकृष्णाचे लग्नी भरीयला घाणा ।

म्हणवेना कोणा निंदक तो ।।2।।

संतु म्हणे म्या तो घाणा भरियला । सिध्दीस तो नेला पांडुरंगे ।।3।।

{क्र.14}

आणिक तो घाणा कोणता सादर ।

सोहं ब्रम्हध्वनी अनुहात गजर ।।1।।

ब्रम्हांड शिखरी ठोक वाजे ।

दशनाथ होती सर्वांचे ब्रम्हांडी ।।2।।

संतु म्हणे हा तो देवा घराचा घाणा ।

सदगुरु वांचोनी कळेनाच कोणा ।।3।।

{क्र. 15}

घाण्याचा कर करा पुसलासी मज ।

तरी तुकयाचा गुज सांगू आता ।।1।।

दशनाद होती सर्वाँचे ब्रम्हांडी ।

तुझे काय पिँडी वाजताती ।।2।।

संतु म्हणे घाण्याचा करकरा ।

दशनादाचा तो खरा जगा माजी ।।3।।

》》》भाग - 4《《《

{क्र.16}

आशा मनशा तृषा माया पाचरी चारी आणून ।

दुर्गतीचा खील त्यामधी दीला ठोकून ।।1।।

त्याच्या योगे चारी पाचरी आल्या आवळून ।

सरकायासी जागा नाही मुळापासून ।।2।।

संतु म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी ।

जग भुलव्या नारी खय्राच ह्या ।।3।।

{क्र.17}

भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी ।

आणिक नारदाशी त्याच रीती ।।1।।

ब्रम्हदेवा आणि विश्वाही मिञाशी ।

तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशी ।।2।।

संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी । काढाव्या वेगशी देहातुनी ।।3।।

{क्र.18}

हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या ।

हाकलुनि दिल्या घरातुनी ।। 1 ।।

अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी ।

गोरोबानी आणि तुकारामजिनी ।।2।।

संतु म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी ।

सद्गुरुवांचोनी ओळखिना कोणी ।।3।।

{क्र. 19}

पाचरीनी प्रताप दाखविला शंकरा ।

भुलवोनी गेला भिल्लीनीशी ।। 1 ।।

विश्वामिञासी रंभेने कुञा बनविला।

मागे मागे नेला घराप्रती ।।2।।

संतु म्हणे अशा घाण्याच्या पाचरी । दाखविल्या चारी सद्गुरुजिनी ।।3।।

{क्र.20}

सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी ।

संसार मोहनी पडली असे ।। 1 ।।

संसार करुनि पाचरी ओळखिल्या ।

उध्दरुनि नेल्या तुकोबाने ।।2।।

संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेने ।

पाचरी बसविल्या घाण्यामाजी ।।3।।

》》》भाग - 5《《《

{क्र. 21}

मनोभक्तीची करुनी लाठ । गुरुकृपेचा बसविला कठ ।।1।।

आगांवरि घेऊनि नेट । दाखवि ।

दाखवि वैकुंठीची वाट ।।2।।

अशी ही संतु तेल्याची लाट ।

कळिकाळाची .... फाट ।।3।।

{क्र.22}

लाट उचलली जगामधी कोणी ।

मार्कँड ञूषिनी आणि विदूरानी ।।1।।

वाल्मीकानी आणि शवरिनी ।

अर्जुनानी आणिक सुदामानी ।।2।।

लाट उचलली भक्तीची । संतु तेल्याचे मुक्तिची ।।3।।

{क्र.23}

संतु तेलियाचे घाण्याची ती लाट ।

उचलितो कोण देउनिया नेट ।।1।।

नेट तो दिधला लंकेचे रावणे ।

उचलेना तेने कदापिहि ।।2।।

संतु म्हणे माझे घाण्याची ती लाट । सुदामा उचली तेव्हांच ती ।।3।।

{क्र.24}

सुदामाशी शक्ति काहीच नव्हती ।

रावणाशी होती पुष्कळच ती ।।1।।

रावणा उचलेना सुदामा उचली ।

मती गुंग झाली रावणाची ।।2।।

संतु तेली म्हणे सद् गुरुवाचोनी ।

लाट ही उचलेना कदाकाळी ।।3।।

{क्र.25}

लाठ माझी माता लाठ माझा पिता ।

लाठी विना कांता विद्रुपची ।।1।।

लाठी हीने मजला दिधली ती लाट ।

चुकवीली वाट जन्ममरणाची ।।2।।

संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट ।

व्यर्थची खटपट करु नका ।।3।।

》》》》भाग-6《《《《《

{क्र. 26}

मन मोहाची करुनि खुटी ।

लाठीस ठोकली बळकटी ।।1।।

फिरे गरगरा लाठी भोवताली ।

ध्यान जाईना लाठीवरी ।।2।।

संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी ।

पहा उठाउठी अगोदर ।।3।।

{क्र.27}

खुटिनें प्रताप कोणास दाखविला ।

दशरथ राजाला आणि नारदाला ।।1।।

दशरथाचा अंत खुंटिनेच केला ।

नारद तो झाला नारदीच ।।2।।

संतु म्हणे अशीहि खुंटी ती मोलाची ।

विश्वाच्या तोलाची एकटीच ।।3।।

{क्र.28}

खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे ।

मनी नाही आले अगोदर ।।1।।

आता तरी सावध व्हारे लवकरी ।

खुंटीविना घाणा घ्यावयाशी ।।2।।

संतु म्हणे माझे घाणे ते राहू द्या ।

खुंटिशी पाहु द्या अगोदर ।।3।।

{क्र.29}

खुंटिने प्रताप कैकईस दाखविला ।

वनवासा राम गेला गादी दिली भरताला ।।1।।

भरतानी त्याग केला पादुकास मान दिला ।

दुःखते होतसे कैकईच्या जिवाला ।।2।।

संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी ।

केली तुटा तुटी मायलेका ।।3।।

{क्र.30}

अशिया खुंटिला धरु नये हाती ।

करिल ती माती सर्वञांची ।।1।।

असेच खुंटिने गोपिचंदन फसविले ।

धातुचे पुतळे जळोनिया गेले ।।2।।

संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुटी ।

सद्गुरुवांचोनी सोडविना मिठी ।।3।।

》》》》भाग - 7《《《《

{क्र.31}

मन झोंपेची करुनी शेंडी । लाठिच्या ठोकुनि तोंडी ।।1।।

काळ मोडुन टाकिल मुंडी ।

कितीहि आल्या झुंडीच्या झुंडी ।।2।।

सोडविना कोणी सद्गुरु वांचोनी । पहा तपासुनि संतु म्हणे ।।3।।

{क्र.32}

शेँडिच्या नादांने किती ते फसले । फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।1।।

तुका वाणी याने शेँडिशी बांधले । कधी नाही भ्याले राञंदिन ।।2।।

संतु म्हणे ऐशी शेँडि ती बांधावी । जोड ती करावी विठ्ठलाची ।।3।।


{क्र.33}

आणिक ते शेंडी उभी हो कोणाची ।

नारद मुनिची असेच कीं ।।1।।

जेव्हा कोंठे कांही कळहि मिळेना ।

तेव्हां ती कडाडे आपोआप ।।2।।

संतु म्हणे अशी शेंडी ज्याची आहे ।

शरण त्यांनी जावे सद् गुरूसी ।।3।।

{क्र.34}

आणिक शेँडीने फसविलेँ कोणा । रावणाच्या भावा कुंभकर्णा ।। कुंभकर्णाशीँ होती झोँप फार । तेणेँ तो आहार फार करी ।। संतु म्हणे शेंडी नसावीँ बा अशी । कुळक्षय लाशी आपोआप ।।

{क्र.35}

झोँपेँत असतांना दिले दान । राजा हरिचंद्राने साडे तीन भार ।। भार सुवर्ण होईना तेँ पुरे। पुरे सर्व देऊन घेतलेँ स्वतःस विकून।। संतु तेली म्हणे हो म्हणेही झोँप। हिचा सर्वाहीँ करा करा कोप।।


》》》》भाग - 08《《《《

{क्र.३६ }

मनोसुविचारी करुनि कातर। शेँडिस टांगली वर हो शेंडीस टांगली वर।।

लाटिचा आधार तिला फार हो लाठि। फिरे गरगरा जोरानेँ हो फिरे गरागरा ।।

मन पवन चाले तो-यानेँ हो मन पवन चालेँ । संतु म्हणे हो म्हणे ही कातर हो । धरावी ध्यानीँ ध्यानी सर्वाँनी।।

{क्र.३७}

कातरिनेँ कातरला दुष्टांचा तो गळा । सावत्याचा मळा सांभाळला।।

कातरीने कातरला रावणाचा मळा । लंकेचा डोँबाळा तिनेँ केला ।।

संतु म्हणे कातर आणिल जो ध्यानीँ। आवडेल तो प्राणी सर्व जगा ।।

{क्र. ३८}

कातरीनेँ कातरला दुःशासन कौरव । आणिक भस्मासुर भस्म केला ।।

आणिक कातर चालली ती कशी । अहि महि लंकेशीं बळी दिले ।।

संतु म्हणे कातर ज्याचेँ देहीँ आहे । त्याची चक्रपाणी वाट पाहे।।

{क्र.३९}

कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ । सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।।

आणिक शत्रुध्न भरत धरियला । सोडुनियां दिला अश्वमेधीँ ।।

संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली । मोडोनिया गेली आपोआप ।।

{क्र.४०}

कातर मोडली कोणाचिये हाते । तारामती आणि हरिचंद्र मते ।।

तशीच कातर कोणी ते मोडली । आनुसया आणि सती सावित्रीनी ।।

संतु म्हणे माझे घाण्याची कातर । फिरे निरंतर सर्वा देहीँ ।।

》》》》भाग - 09《《《《

{क्र. ४१}

मन शांतिची करुनी शिळ । तिजवर बसलेँ माझेँ कुळ ।।

तिच जन्म मरणाचे मुळ। असेँ माझेँ सांगणे समुळ।।

संतु म्हणे ही शिळ जेथेँ आहे । तेथेँ यम पाश उभा राहे ।।

{क्र.४२}

असा यम पाश लागलां कोणाशीँ । लागतो सर्वाँशीं शेवटीँ तो ।।

आणिक कोणाशीँ लागला तो पाश । मार्कँड ऋषी आणि सत्यवानाशीँ ।।

संतु म्हणे धरा शांती तुम्ही देहीँ । नरकाचे डोही जाऊं नका।।

{क्र.४३}

मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश । केला तेणेँ ध्यास शंकराचा ।।

सत्यवाना गळी पडतांच पाश । केला त्याचा नाश सावित्रीने ।।

संतु म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ । देतेँ तिळगुळ यमा हाती।।

{क्र.४४}

क्षमा शांती जया नराचिये देहीँ । दुष्ट तया कांही करीत नाही ।।

जरि ही कोणाशीँ राग फार आला । तरि तुं धरिरे शांती फार ।।

संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली । तेथेँ उडी आली यमाजाची ।।

{क्र.४५}

आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ । अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।।

आणिक कंसाचे दारी होती शिळा । आपटि तिजवरी कृष्णाजिचेँ कुळा ।।

संतु म्हणे तुम्ही ध्यानीं धरा शिळा । उध्दाराया कुळा आपुलिया ।।

》》》》भाग - 10《《《《

{क्र. ४६}

सुबुध्दिची वढ घेऊन । विवेक कातरीस बांधून ।।

मन पावन ओढी जोरानेँ। मग तो घाणा चाले मौजेने ।।

संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ । करा वढावढ जन्मवरी।।

{क्र. ४७}

अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली । देवा आणि दैत्यांनि मिळोनियां ।।

मंथन ते केलेँ सप्त समुद्राचेँ । हाता काय आलेँ काळकुट ।।

संतु म्हणे ओढ फार ओढुं नये । तुटेल ती पाहे सहजची।।

{क्र.४८}

आणिक ती ओढ पाहिली कोठेँ होती । कृष्णाच्या गोकुळी गोपी हाती ।।

घुसळण करी देवकी ती माता । लोणी खात होता जगदात्मा ।।

संतु म्हणे माझ्या घाण्याची ती वाढ । जन्माची जोड हेची माझी।।

{क्र.४९}

मारुतीस वढ दिली रामचंद्राने । तशीच कृष्णाजीनेँ दिली अर्जुनास ।।

कर्णानेँही दिली सारथी शल्यास । आणिक ती दिली धर्मानीँ कौरवांस ।।

संतु म्हणे ही वढ जो जाणील । तोच कुला उध्दरुनी स्वर्गी नेइल ।।

{क्र.५०}

अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ । ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।।

मागुनि तो आला मारुती हा बळी । लंका मग जाळी दशकंठाची ।।

संतु म्हणे वढ आहे अवघड । हिशीँ काढा तोड कांही तरी ।।

》》》》भाग - 11《《《《

{क्र. ५१}

संसाराचे धरुन जोखड । जिजाबाई ह्याच्यासाठी रडे ।।

तुकाचे नावेँ फोडी खडे। विठ्याशीँ बोटेँ मोडी कडकडे ।।

संतु म्हणे हे जोखड वाईट । याचा येवो विट सर्वाँलागीँ ।

{क्र. ५२}

नको नको जोखड म्हणे तुकावाणी । जिजाबाई राणी हानी मारी ।।

म्हणे कैसेँ तुला लागलेँ हे वेड । संसारात जोड करि कांही ।।

संतु म्हणे असेँ आहे हेँ जोखड । करा कांही जोड देवाजाची ।।

{क्र. ५३}

प्रपंचाचे घेऊनि जोखड । युवतिच्या करि पुढेँ पुढेँ ।।

देवाची करिना कधी जोड । हीँव भरी झालाशीँ बिनतोड ।।

संतुबा म्हणे हे जोखड । ह्यांस पाहतां संत रडे ।।
{क्र. ५४}

नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।

नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे । आमुचिही मनेँ बिघडविलीँ ।।

संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड । आहे फार जड जगामाजी ।।
{क्र. ५५}

जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ । आणिक वाल्मीकासी फसविलेँ ।।

फसविलेँ आणिक कैकेयी मातेशी । मंथरा दासीसी त्याच वेळीँ ।।

संतु म्हणे तुम्ही फसुं नका यांस । सदगुरुची कास धरा वेँगीँ ।।
》》》》भाग - 12《《《《

{क्र.५६}

मन मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे आंत ।।

तरी आकळेना बहुत याची मात । पाडली तीन भोकेँ मस्तकांत ।।

संतु म्हणे हा मोठा बोका। मस्तकी बाहुली ठोक ।।

{क्र.५७}

मत्सर धरियला जगांमध्येँ कोणी । सत्यभामा रुक्मिणी ।।

भांडण ते केलेँ कृष्ण या देवासी । फुल पारिजातक मिळवावयासी ।।

संतु म्हणे हा मत्सर । जगामध्येँ महा चोर जगामध्येँ ।।
{क्र.५८}

आणिक मत्सर धरियला कोणी । सुमित्रा आणि कैकेयीनेँ ।।

भांडण तेँ केलेँ राजा दशरथाशीं । गादी भरताशी मिळावया ।।

संतु म्हणे हा मत्सर । तुकोबाचे घरचा केर।।
{क्र.५९ }

आणिक तो हात पाहिला कोठेँ । सुलोचना अंगणीँ पडियला ।।

हातानी त्या लिहीला सकळ समाचार । उडविला जो कहर लंकेवरी ।।

संतु म्हणे असा हात तो हुशार । केला जार जार सुमित्रानेँ ।।

{क्र.६०}

आणिक तो हात पाहिला कोठेँ । गौरोबाचे येथेँ मंदिरात ।।

गौरोबानेँ हात तोडुनि घेतले । पुन्हां मग दिले विठ्ठलानेँ ।।

संतु म्हणे असा आहे हो हा हात । त्याची गेली मात त्रैलोकांत ।।

》》》भाग - 13《《《

{क्र.६१}

औट हाताचे बाहुले करुन । घाण्या भोँवती फिरे पाहुन ।।

प्रपंच जोखड शिरीँ घेऊन । चाले मन पवन आनंदाचे ।।

संतु म्हणे हेँ बाहुले । जन्मवरी करी हुल हुल ।।

{क्र.६२}

अशीँ हीँ बाहुलीँ नाचवी पांडुरंग । जगांत जन्मासी घालुनियां ।।

केव्हा केव्हां म्हणे जन्माशीँ येतांच । आखेर बैमानी झालेच ते ।।

संतु म्हणे माझा विठ्ठल तूं सखा । आम्हां जन्मासीँ घालुं नका ।।

{क्र.६३}

जन्मोनियां इहलोकीँ काय केलेँ।पुष्कळच ते धन मिळविलेँ ।।

आणिक मिळविलेँ वतनवाडिशीँ।रांडा आणि पोरां आवघ्याशीँ।।

संतु म्हणी तुम्हीँ मागेँ ते सरावेँ । मरावेँ परी किर्तीरूपे उरावेँ।।

{क्र.६४}

तुझिया सांगातीँ येते कांही कांही। कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।।

सोयरा न येतोँ बंधू ही येईना।। येईना रांडा पोरेँ अंतकाळी ।।

संतु तेली म्हणे उरलिया वेळीँ। आठवा वनमाळी रात्रंदिन।।

{क्र.६५}

संसराकरितां जन्म वायां गेला । काळ न्याया आला आवचित् ।।

सोडी सोडी यमा मज क्षणभरी । घरातील ठेवा दाखवूं दे।।

संतु म्हणे यम कसा तो सोडील । नाडील आवघ्यासीँ सावध व्हारे।।

》》》भाग - 14《《《

{क्र.६६}

सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यानोँ।

आवघ्या जनानोँ सावध व्हारे।। काळाचिये उडी पडेल बा जेव्हां।

सोडविना तेव्हां माय बाप।। संतु तेली म्हणे सावध कोण झाला। देहासहित गेला तुकावाणी।।

{क्र.६७}

मन पवनाच्या करूनि नंदी।

पाहूनि संसारामधीँ संधीँ।। जोखड घेऊनियां खांदी।

भ्रमाची झांपडी बांधी।। संतु तेली म्हणे हा नंदी।

करितो सर्व जगाची चांदी।।

{क्र.६८}

मन हेँ ओढाळ गुरु फार आहे।

परधन पर कामिनीकडे धांवेँ।। असेच हे मन राहिना हो स्थिर।

नेहमीँ हुरहुर लागली असे।।

संतु म्हणे मन करा तुम्हीँ स्थिर।

राऊळा आंगणीँ जाऊनियां।।

{क्र.६९}

मनाला तो बोध रामदासांनेँ केला।

उपदेश दिला जगामाजीँ।। चंचल हेँ मन धांवेँ सैरावैरा।

यानाच मातेरा केला देहाचा ।। संतु म्हणे मन लावा देवावरी।

विठ्ठल विटेवरी उभा असे।।

{क्र.७०}

आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।

आमुचा उद्देश घराकडे।। हालवितो माना ऐकुनियां खुणा।

विसरलोँ जाणा घरीँ जाता।। संतु म्हणे तुम्हा सांगतोँ मी वेळीँ।

आयत्या वेळीँ कांही होणेँ नाहीँ।।

》》》भाग -15《《《

{क्र.७१}

पवन तो नंदी असे शंकराचा।आणीक बळीचा शेतकिचा ।।

नंदीनेँ घेतला सर्वाँचा तो भार।कळेना तो पार कोणासही।। संतु म्हणे नंदी मारील हो तुम्हां।दर्शनाशीँ न जातां शंकराच्या।।

{क्र.७२}

घेऊनिया घाणा तेल काढियले।गि-हाइक संत मंडळीचे आले।। कसे देतां तेल सांगावे संताजी।तुम्ही काय घेता घेणार तो तुका।। संतु म्हणे तेल जो कोणी घेईल।कानीँ तेँ फुंकिल बाबाजी महाराज।।

{क्र.७३}

संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो।तुका वाणी येतो घ्यावयास।। घाला तुम्हीँ तेल आवघ्याच नळ्यांत। गळ्यांत जो आहे त्यांतही घाला।। संतु म्हणे तेल घालुनि उरले।मोल त्याचे दिलेँ पांडुरंगे।।

{क्र.७४}

आणीक हे तेल घेतलेँ कोणी।निवृत्ती ज्ञानेबांनी आणि सोपानानी।। मुक्ताबाईनी आणि एकनाथजिनी।तेल हे घेतलेँ नामदेवाजिनी।। संतु म्हणे तेल कोणी जो घेईल।दुकाना येईल विठलाच्या।।

{क्र.७५}

आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी।गो-या कुंभारानीँ चोख्या महारानीँ।। तसेच घेतले नरहारी सोनारानीँ।कबीरानीँ आणि रोहिदास चांभारानीँ।। संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल। त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग।।

》》》भाग - 16《《《

{क्र.७६}

आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी । सांवतामाळी यांनी आणि विदुरानीँ ।।

तसेच हे तेल घेते जनाबाई । मागेँ पुढेँ पाही कान्हुपात्रा ।।

संतु तेली म्हणे तेल आवघेँ झालेँ । पुष्कळ तेँ नेलेँ तुकोबानेँ ।।
{क्र.७७}

संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा।आपलेँ कृपेनेँ फळ दिलेँ आम्हा ।।

नाहीँ तरी आम्हां कैचे ज्ञान कांही । मुळीँच तेँ नाहीँ पाठांतर ।।

संतु म्हणे कांहीँ सांगितलेँ नाही।पांडुरंग पायीँ धरियलेँ।।

{क्र.७८}

मारवाडी मारवाडचा, गुजर गुजराथेचा।

कानाडी कानड्याचा,मुसलमान तो दिल्लीचा।।

मराठी महाराष्ट्राचा । कोँकणी कोकणचा ।।

संतु तुका या देशीचा ।

वाणी होय की तो साचा ।। संतु म्हणे वाणी तुका ।

विठल चरनीँ वाहु बुका।।

{क्र.७९}

देवासीँ अवतार भक्तांसीँ संसार।

दोहीँचा विचार एकपणेँ।। भक्ताशी सोहळे देवाचिये आंगे।

देव त्यांच्या संगे सुख भोगी।। देवेँ भक्तारूप दिलासे आकार।

भक्ती त्याचा परिवार वाणिला।। एक आंगीँ दोन्हीँ झालीँ हीँ निर्माण ।

देव भक्तपण स्वामी सेवा।। संतु म्हणे येथेँ नाहीँ भिन्न भाव।

भक्त तोचि देव देव भक्त।।
{क्र.८०}

दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे।

एक उभा राऊळा आंगणीँ।। एक घाना बैसे जाऊनि।

एक जपे जप माळ,एक वाजवितो टाळ ।।

एका आंगा लाविले गंध।

एका अंगा येई सुगंध।। एक वाजवितो विणा ।

एक दाखवितो खुणा।।

एक म्हणतो अभंग ।

एक म्हणे पांडुरंग।। संतु म्हणे एक जीँव।

दोहोँ कुडी दिला ठाव।।

》》》भाग -17《《《

{क्र.८१}

एक कुडी वोष्णवाची । एक कुडी ती स्नेहाची ।।

एका कुडी घातलेँ शिट। एक कुडी दिसे तेलकट ।।

एके कुडी घातली माळा।एकीचा रंग दिसे सावळा ।।

संतु म्हणे कुडी टोपन। हिचे करूं नका जोपन।।

{क्र.८२}

आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन । परि पाहीँ मन सारखेच ।।

नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी । परि तेही जोडी होय पून्हां ।।

संतु म्हणे ह्याचे कारण तेँ कांही। शोधुनियां पाहीँ ग्रंथांतरी।।

{क्र.८३}

आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी।

आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ।। तुका विकी सौदा आणिक मिरची।

संतु विकी तेल लागुनि चुरशी।। तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे।

तुकयाशी खुण पटली असे।।

{क्र.८४}

धन्य धन्य संतु होशिल तूं जाण।

तुजलागी ज्ञान फार आहे।। व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक।

मजलागी देख कळो आलेँ।। ज्ञानाचा सागर होशील तूं योगी।

नेणती हेँ जगीँ मूढ जन।। तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान।

ऐकतां वचन गोड लागे।।

{क्र.८५}

जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता।काय तुज आता सांगू वर्म।। किँचित तो अर्थ जरी भरे मना।
मग त्याच्या ज्ञाना पार काय।। यमाच्या घरची जाचनी चुकली।
मूळ भेदी खोली उंच पहा।। संतु म्हणे मी तोँ देहीँच पाहीलेँ।
पुढील चुकविलेँ गर्भवास।।

🙏🌹 *जय संताजी* 🌷🙏🚩 *गुरुमाऊली* 🚩

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹

स्त्रोतपर माहिती

सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

हुतात्मा भास्कर पांडूरंग कर्णिक




हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक. (भारतीय क्रांतिकारक)

जन्म : ७ डिसेंबर १९१३ (करूळ, रत्‍नागिरी, महाराष्ट्र )
मृत्यू : ३० जानेवारी, १९४३ (पुणे, महाराष्ट्र)

📖 शिक्षण

त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ गावी, तर माध्यमिक शिक्षण गुलबर्गा येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्‌सी. केले आणि १९४२ साली ते पुण्याजवळच्या देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस लागले.

💣 अर्धा ट्रक बॉम्ब

देहूरोड येथील एच. डेपोमध्ये असताना भास्कर कर्णिक यांनी तेथून बॉम्ब पळवायला सुरुवात केली. बाजूला काढून ठेवलेल्या बॉम्बच्या खोक्यांतला एक बॉम्ब रोज जेवणाच्या डब्यातून बाहेर आणला जाई. अश्या पद्धतीने कर्णिक यांच्याकडे अर्धा ट्रक भरेल एवढे बॉम्ब जमा झाले होते. या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुढे पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात टाकण्यात आले. बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये असे सहा जण जेलमध्ये गेले, पैकी दत्ता जोशी जेलमध्येच वारले, बाकीचे काही काळानंतर सुटले.

⏳ फरासखान्यात मृत्यू

कॅपिटॉलमध्ये सापडलेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून हे बॉम्ब कोठून आले याचा पोलिसांनी शोध घेतला, आणि त्यांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले. आणल्यानंतर कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली. त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कृत्यामुळे कर्णिकांकडून मोठी माहिती मिळेल असे वाटणार्‍या पोलिसांची निराशा झाली. कर्णिकांच्या बलिदानामुळे मोठ्या संख्येने क्रांतिकारक वाचले.

💣 हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक

‘कॅपिटल व वेस्टएंड’ ही पुण्यातील दोन सिनेमागृहे होती. तिथे गोरे अधिकारी परिवारासह सिनेमा पहायला जात. कॅपिटल म्हणजे आजचे VICTORY सिनेमागृहात प्रचंड बॉम्बस्फोट झाला. त्यात चार युरोपियन्स ठार झाले व १४ जण जखमी झाले. त्यावेळी हॅमंड व रोच या गोऱ्या अधिकाऱ्यांची माथी भडकली. दारूगोळा कुठून आला? बॉम्ब कसे बनवले? याबाबत हैराण झाले. त्यानंतर अनेकांची धरपकड झाली.

प्रथम हाती लागला तो आगाशे नावाचा तरूण. त्याच्याकडून जोगेश्वरीच्या देवळाचे पुजारी भालचंद्र बेंद्रे यांचे नाव समजले. मध्यरात्रीनंतर देवळाला वेढा देऊन झोपेत असताना बेंद्रेंना पकडले. तर दुसऱ्या दिवशी जंगली महाराजांच्या देवळासमोरील जज्ज पाटील यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या भास्कर पांडुरंग कर्णिक नावाच्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिस्तुल रोखून उलट सुलट तपासणी केली. खोलीची झडती घेतली असता खॉटखाली ढिगभर बॉम्ब सापडले. हॅन्ड ग्रेनेड्स बनवायची स्फोटके सापडली.

त्यानंतर भास्कर कर्णिकला हॅमंडचे फरासखान्यात मुसक्या बांधून आणले व पोलिसांना इशारा दिला. बाहेर केसरीचे वार्ताहर वि. स. माडीवाले व सकाळचे भि. न. ठाकोर बातम्या मिळविण्यासाठी आले होते. त्यांनी भास्करला पोलिसांच्या गराड्यात पाहिले. भास्कर शांतपणे म्हणाला, साहेब तुम्ही मला पकडलेच आहे. आता मी काय लपवणार? तुम्हाला मी माझ्या सहकाऱ्यांची सर्व नावे सांगतो, पण मला खूप लघवीला लागली आहे. जरा जाऊन येतो. पोलिसांनी खुश होऊन परवानगी दिली. पुढेमागे पोलीस ठेवून भास्कर कर्णिक यांना शौचालयात जाऊ दिले. त्याने दार लोटून घेतले आणि १० मिनिटातच बाहेर आला आणि फरासखान्याच्या पहिल्या चौकाच्या अलिकडे धाडकन खाली कोसळला. काय झाले कुणालाच कळेना. पोलीसही चक्रावून गेले.

हॅमंड साहेबांनी तातडीने डॉ. जेजुरीकरांना बोलावून भास्करला तपासायला लावले. पण भास्करचे प्राण कधीच गेले होते. हॅमंडच्या अमानुष मारहाणीपुढे कदाचित आपला टिकाव लागला नाही आणि चुकूनसुद्धा आपल्या सहकाऱ्यांची नावे तोंडातून जाऊ नयेत यासाठी हुतात्मा भास्कर कर्णिक याने योजना आखून ठेवली होती.

त्याने पोटॅशियम सायनाईटच्या जहाल विषाची कुपी मुद्दाम वाढवलेल्या नखामध्ये लपवून ठेवली होती. लघवीच्या निमित्ताने शौचालयात जाऊन ते विष पिऊन टाकले आणि पोलिसांच्या कचाट्यातून आणि पुढील लढ्यासाठी आपल्या इतर सहकाऱ्यांची सुटका केली. ३० जानेवारी १९४३ रोजी भास्कर पांडुरंग कर्णिक याने हौतात्म्य पत्करले.

🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

स्त्रोतपर माहिती

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

जागतिक अपंग दिन/ दिव्यांग दिवस


जागतिक अपंग दिन/दिव्यांग दिवस हा युनायटेड नेशन्स हे एकत्रित कार्य करून अपंगासाठी जाहीर केला. हा दिवस अपंगासाठी व त्यांच्या कार्य क्षमतेसाठी साजरा केला जातो.या दिवसाचा थोडासा इतिहास: हा दि १९९२ मध्ये जाहीर केला. ह्या दिवशी जनरल असेंब्ली अपंगत्वाबाबत जागृकता, त्यांना राजकीय, सामाजिक, कार्यक्रमास सामील करून घेण्याची भावना वाढवण्यासाठी कार्य केले जाते. १९९९ साठीची यांची थीम ही “सर्वांना नविन शतकाची प्रतिक्षा आहे." जवळजवळ अर्धा बिलीयन लोक, शारीरीक, न्सेसरी, मानसिक यापैकी कोणत्याही प्रकारामुळे अपंग आहेत. ते जगाच्या कोणत्याही भागात राहात असले तरी त्यांच्या आयुष्यावर शारीरीक व सामाजिक प्रकारची अनेक बंधने येतात.अपंगाना अनेक क्षेत्रात मान्यता मिळवण्यास गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या क्षेत्रात घडलेली चांगली घटना ज्या मुळे या क्षेत्राला क्षूप चांगले वळण मिळाले ती म्हणजे, १९८१ मध्ये जनरल असेंब्ली ने जाहीर केलेले अपंगत्व वर्षे. तसेच जागतिक अपंगत्व दशक (१९८३ ते १९९२) हे अपंगाचा संपूर्ण सहभाग आहे आणि बरोबरी या भावना वाढवण्यासाठी ह्या दशकाचा वापर केला गेला.
अपंगाच्या हालचालीवर अभ्यास करण्यासाठी १९९२ मध्ये जनरल असेंब्ली ने कार्यक्रम सादर केला होता.
जागतिक कार्यक्रमाला आधारून सॅन्डर्ड रूलस्‌ ऑन इकवॅलायलेशन ऑफ अपॉर्च्यूनिटीस्‌ फॉर परसन्स विथ डीसऍबिलीटीज हे १९९३ मध्ये तयार केले गेले.
ते सर्व नियम गव्हर्मेंट ला बंधन कारक नव्हते. अपंगाच्या नैतिक भावना या नियमांची बळकट झाल्या. युनायटेड नेशन्स चे कार्य हे मिळणार्‍या संधि सर्वत्र उपलब्ध होत आहे यावर केंद्रित होते
संयुक्त राष्ट्रसंघातफेर् १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगाच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले होते. दशकअखेरीस तीन डिसेंबरची निवड झाली होती व १९९२ मध्ये पहिला 'अपंग दिन' साजरा झाला होता.
आज जगातली दहा टक्के लोकसंख्या, म्हणजेच सुमारे ६५ कोटी लोक या ना त्या रूपाने अपंग आहेत. जागतिक आरोग्य संघटनादेखील अपंग बांधवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्नशील असते. त्यासाठी विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले जातात.
हा दिवस साजरा करताना चार महत्त्वाच्या
पायऱ्या लक्षात घ्यायला हव्यात :
१) शाळा, कॉलेजस्, सरकारी-खाजगी-निमसरकारी संस्थांतफेर् आयोजित उपक्रमात सहभागी होणे.
२) विविध प्रचार मोहिमा आयोजित करून अपंगाच्या प्रश्नांना वाचा फोडणे. त्यांना सहकार्याचे अभिवचन देणे.
३) अपंग बांधवांच्या ठायी असलेल्या छुप्या कलागुणांचा साक्षात्कार होण्यासाठी उत्सव-मेळावे भरविणे आणि त्यांची जगण्याची उभारी वाढविणे.
४) अपंगांच्या उद्धारासाठी जागतिक स्तरांवरची नियमावली कटाक्षाने पाळली जात नसेल तर त्यासाठी काटेकोरपणे दक्षता घेऊन ते मार्गी लावणे. 
असाध्य ते साध्य
बालमित्रांनो, ३ डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने काही प्रेरणादायी अपंग व्यक्तींची माहिती करून घेऊ या. या सर्व व्यक्तिचित्रांमध्ये एक धागा समान आहे. या व्यक्तींनी शारीरिक व्याधींवर मात करून स्वत:चे सामथ्र्य सिद्ध करून दाखवले आहे.
जागतिक अपंग दिन - प्रेरणादायी अपंग व्यक्तींची माहिती यशोगाथा!
हेलन केलर – १८८० साली जन्मलेल्या हेलन केलर यांच्यावर मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व आणि अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या कोसळली. यापकी कोणतेही एक अपंगत्वसुद्धा सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करायला पुरेसे असते. परंतु या असामान्य स्त्रीने शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आपले उच्चशिक्षण डोंगराएवढय़ा अडचणींना तोंड देत पूर्ण केले. हेलन अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका आणि समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या.
बी. एस. चंद्रशेखर – भारतीय क्रिकेटला परदेशात विजयाची चटक लावणारी चंद्रशेखर-बेदी-प्रसन्ना-वेंकटराघवन् ही फिरकी गोलंदाजांची चौकडी सर्वपरिचित आहेच. यातील चंद्रशेखर हा सर्वात भेदक लेग स्पिनर होता. चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता. आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.

सुधा चंद्रन – एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. आणि नुसतीच उभी न राहता तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली.
ऑस्कर पिस्टोरियस – पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा दक्षिण अफ्रिकेचा ब्लेड रनर-धावपटू. हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित १००, २०० व ४०० मीटर रिनगमधील सुवर्णपदक विजेता आहेच, शिवाय २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पध्रेत ४०० मीटर स्पध्रेसाठी पात्र ठरून आपण अव्यंग लोकांपेक्षा कमी नाही, हेही सिद्ध केले.

मन्सूर अली खान – टायगर पतौडी यांनी कार अपघातात आपला उजवा डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. एवढेच नव्हे तर कप्तानपदाची धुराही सांभाळली. केवळ एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक आणि भरवशाचा फलंदाज असा लौकिकही मिळवला.
स्टीफन हॉकिंग – या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा असा असाध्य आजार झाला की ज्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला.
लुईस ब्रेल – वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त




विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त

जन्म: १८ नोव्हेंबर, १९१०( ओरी, पूर्व बर्दमान जिल्हा, बंगाल,भारत )

मृत्यू: २० जुलै, १९६५ ( नवी दिल्ली, भारत )

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: हिंदुस्थान सोशालिस्ट

रिपब्लिकन असोसिएशन,

नौजवान भारत सभा

धर्म: हिंदू

वडील: गोठा बिहारी दत्त

पत्नी : अंजली दत्त

नागरिकता : भारतीय

विशेष माहीती : ८ एप्रिल १९२९ ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी प्रेक्षक दिर्घिकेमधून केंद्रिय असेंब्लीमध्ये मोकळ्या जागी बाँम्ब फेकला.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताने अगणित बलिदानं, अगणित वार झेलत स्वातंत्र्य मिळवलं. या स्वातंत्र्याच्या संग्रामात न जाणो कित्येक तरुणांच्या, कित्येक क्रांतिकारकांच्या, कित्येक देशभक्तांच्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्या गेल्या आणि जे वाचलेले त्यांचं संपूर्ण आयुष्यही दिलं गेलं होतं.

पण १९४७ नंतर या सगळ्या स्वातंत्र्यसमरात सहभागी झालेले आणि हयात असलेले क्रांतिकारी जे जहाल गटातले होते त्यांचं पुढे काय झालं हे फारसे लोकांना माहिती नाही.

स्वतंत्र भारतासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या अशा कितीतरी क्रांतिकारकांनी अक्षरशः वैमनस्य आणि अत्यंत हलाखीच्या गरिबीत दिवस काढले. बरेच जण या गरीबीतच वारले.

अशाच एका सरकारी उदासीन वागणुकीचा बळी पडलेल्या शहीद-ए- आझम असणाऱ्या भगतसिंगांचा सगळ्यात जवळचा मित्र बटुकेश्वर दत्त.

८ एप्रिल १९२९ ही घटना सगळ्यांच्या लक्षात आहे. आजही ब-याचशा पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते की भगतसिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतल्या असेंब्लीमध्ये खाली जागेत दोन बॉम्ब टाकले. ‘इन्कलाब जिंदाबाद’चे नारे दिले.

सगळ्या गदारोळात तिथून पळून जाणं शक्य असतानाही दोघांनी आत्मसमर्पण केलं. कारण होतं निदान खटल्याच्या निमित्ताने का होईना संपूर्ण देशासमोर आपले विचार ठेवता येतील. पुढे काळानुसार (साण्डर्स वधाचा खटला) राजगुरू, सुखदेव यांना फाशी झाली मात्र दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

१९२९- १९४२ इतकी वर्षे त्यांनी अंदमानात अत्यंत हलाखीच्या दिवसात काढली. १९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर सुद्धा शांत न बसता ‘छोडो भारत’ अभियानात सुद्धा ते सहभागी झाले आणि त्यांना पुन्हा अटक झाली. या अटकेतुन ते सुटले, मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर.

बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०६ ला ओवारी नावाच्या गावात जे आत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे तिथे झाला. बटुकेश्वर दत्त यांना जवळचे मित्र बिके, बट्टू अशा नावांनी हाक मारायचे. तिथल्याच पीपीएम हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

महाविद्यालयीन काळातच ते आझाद आणि भगतसिंगांसारख्या तरुणांच्या संपर्कात आले. ‘हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन’ या जहाल क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात येऊन आपापल्या पद्धतीने का होईना पण भारताला स्वातंत्र्य मिळवायचे यासाठी ते काम करू लागले.

१९२९ या बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणानंतर काही काळासाठी त्यांना लाहोर जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ठेवण्यात आले. तेथे त्यांनी आणि भगतसिंगांनी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली की आम्ही राजकीय कैदी असताना सुद्धा आम्हाला गुन्हेगारासारखं वागवले जात आहे.

ते बंद व्हावं म्हणून त्यांनी जवळजवळ ४० दिवसांचं उपोषण केलं. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या पण पुढे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा दिली गेली आणि बटुकेश्‍वर दत्त यांची रवानगी अंदमानात झाली.

एक वेळ मृत्यू परवडला पण अंदमान नको अशी परिस्थिती असणाऱ्या या अंदमानात १९४२ पर्यंतची वर्ष अत्यंत हलाखीत, अत्यंत हाल अपेष्टा सहन करत त्यांनी काढली. वीर सावरकरांच्या चरित्रात सुद्धा काही वेळा या दत्तांचा उल्लेख येतो.

१९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर ताबडतोब महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिल्लीत निदर्शने करत असताना त्यांना पुन्हा अटक झाली ती चार वर्षांसाठी.

१९४७ ला भारत वसाहतवादी सत्तेच्या तडाख्यातून मुक्त झाला आणि दत्त सारख्या अनेकांची सुटका झाली. ज्याच्यासाठी आतापर्यंत आपण आपले आयुष्य वेचले निदान त्या स्वतंत्र भारतात तरी क्रांतिकारकांना, देशभक्तांना योग्य स्थान, योग्य मान मिळेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

याचाच अर्थ या तरुणांनी क्रांतिकारकांनी आपले शरीर आणि आपले आयुष्य या स्वांतत्र्य कार्यात वाहून घेतलं, आपलं समर्पण दिले आहे, आपलं बलिदान दिले त्या सगळ्यांचे बलिदान व्यर्थ होते.

अर्थात या सगळ्या शिक्षा भोगून राहिलेले क्रांतिकारक स्वतंत्र भारतात सुद्धा काही मान किंवा जगण्याला पुरेल अशी व्यवस्था सुद्धा मिळवू शकले नाहीत.

इंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत.

🌞 *क्रांतिकारकांची अतुल्य देशभक्ती: स्वातंत्र्य सूर्य बघण्यासाठी मृत्यूलाही रोखून ठेवले!*

बटुकेश्वर दत्त सारख्या क्रांतिकारकांना सरकारच्या कार्यालयांमध्ये जगण्याला पुरतील एवढे पैसे मिळवणारी नोकरी मिळावी म्हणून कित्येक वर्षे हेलपाटे घालावे लागले. अर्थात तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार ती काही त्यांना मिळाली नाही हे उघड आहे.

अशातच त्यांनी लग्न केलं आणि अनेक व्यवसाय करून बघण्याचे अपयशी प्रयत्न केले. सतत चरितार्थादाखल होणारी उपासमार आणि हाल अपेष्टा यातून त्यांना बरेच आजार झाले. या आजारातूनच त्यांनी एक १९६५ ला दिल्लीच्या ए आय आय एम एस हॉस्पिटल मध्ये प्राण सोडला.

त्यांचे दहन त्याच ठिकाणी करण्यात आलं ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी त्यांचे सहकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे करण्यात आलं होतं.

१९२९ मधला बॉम्ब फेकण्याचा प्रसंग आणि भारताचं मिळालेले स्वातंत्र्य या सगळ्या गडबडीत कुठेतरी अनेक क्रांतिकारकांच्या, अनेक देशभक्तांच्या कथा लुप्त झाल्या, हरवल्या.

दत्ताचं आयुष्य असंच कुठेतरी गायब झालं. दुर्लक्ष केलं केलं.

बॉम्बफेकीच्या प्रकरणानंतर बटुकेश्वर दत्तांच्या वकील असलेल्या असफ अली यांनी सांगितलं होतं की मुळात बटूकेश्वर दत्तांनी बॉम्ब फेकला नव्हता. बॉम्ब फेकला तर फक्त भगतसिंग यांनी पण अटक होत असताना बटुकेश्वर दत्त खोटं म्हणाले की, होय मी बॉम्ब फेकला आहे आणि त्यांना अटक झाली.

एक सच्चा मित्र जो मित्राच्या शब्दाखातर त्याच्या बरोबर एका आत्मघातकी कटात सहभागी झाला, खोटे बोलून त्याच्या बरोबर आयुष्यभर पुरतील एवढ्या यातना सहन केल्या, अखंड भारत स्वतंत्र व्हावा हे स्वप्न बघितलं, त्याला काय मिळालं तर दुर्लक्षित दुर्दैवी आणि दारिद्र्य भरलेलं आयुष्य.

आज आपण अशा अनेक क्रांतिवीरांच्या आठवणी काढल्या काय व त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने कार्यक्रम पुरस्कार दिले गेले काय पण त्यांनी जगलेला आयुष्य आणि त्यांना स्वतंत्र भारतात मिळालेली वागणूक बदलू शकत नाही.

*...ते अमर हुतात्मे झाले....!!*

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *विनम्र अभिवादन*🙏

स्त्रोतपर माहिती

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे


  क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

 *जन्म : 2 जानेवारी 1888*(तळेगाव(ढमढेरे) महाराष्ट्र, भारत)

  *फाशी : 16 नोव्हेंबर 1915* (लाहोर कारागृह, पाकीस्तान)

स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे ! 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावच्या गरीब घरात २ जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. तीन भाऊ आणि चार बहिणींनंतरचं हे शेंडेफळ. चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या स्वभावामुळे ते कोल्हापूरच्या ‘समर्थ विद्यालयात’ दाखल झाले. नंतर ते विद्यालय तळेगाव दाभाडे इथं सुरु झालं, तिथं ते आले. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारं हे विद्यालय ब्रिटीशांच्या रोषाला बळी पडून १९१० मध्ये बंद झालं. मग त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी केली, नंतर स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी त्यांनी लातूर जवळ हातमाग टाकले. मग मेकॅनीकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून, घरी काहीही न सांगता ते १९११ मध्ये थेट अमेरिकेत पोहोचले.  शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी तिथे त्यांनी अपार कष्ट केले. ते अमेरिकेत असल्याची वार्ता कित्येक महिन्यांनी त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचली. सावरकरांचे अभिनव भारत मधील निकटचे सहकारी लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर चळवळ सुरु केली होती. १९१४ ला महायुद्ध सुरु होताच, हिंदुस्तानात जाऊन क्रांती करण्याची हीच योग्य संधी आहे असा प्रचार त्यांनी गदर पत्रातून सुरु केला आणि विष्णु गणेश पिंगळे आपल्या कष्टसाध्य सुंदर भविष्यावर अक्षरश: लाथ मारून गदर मध्ये सामिल झाले आणि हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्याकडे वळवण्याच्या विभागाचे प्रमुख झाले.

सप्टेंबर १९१४ मध्ये ‘कोमा गाटा मारू’ हे जहाज शेकडो शिख क्रांतिकारकांना घेऊन हिंदुस्थानात पोहोचलं. त्यानंतर अनेक शीख वेगवेगळ्या जहाजातून परतत राहिले. नोव्हेंबर मध्ये पिंगळे गुप्तपणे हिंदुस्तानात परतले ते ही शांघाय सारख्या काही ठिकाणी जहाल भाषणं करतच. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, पंजाबी भाषेवर प्रभुत्व असलेले पिंगळे पंजाब, बंगाल मध्ये वेश, नावं बदलून क्रांतिकारकांच्या  भेटी घेत, गदरचा प्रचार करीत राहिले. हिंदू, शीख, मुसलमान एकत्र आले. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ यांच्या सहाय्यानं पिंगळे यांनी उठावाची योजना आखली होती. सबंध पंजाब, बंगालपासून ते सिंगापूरपर्यंत क्रांतीची बीजं पेरली गेली होती. शस्त्र, बॉंबगोळे जमवले गेले होते. गनिमी काव्यानं ब्रिटीश सरकारला नामोहरम करण्याची ती  योजना प्रत्यक्षात आली असती तर लाहोरपासून सिंगापूरपर्यंत १८५७ सारखी पण एक यशस्वी उठावणी झाली असती. पण याही वेळी फितुरी झाली आणि बाजी पलटली. मीरत इथल्या लष्करी छावणीत फितुरीनं विष्णु गणेश पिंगळे पकडले गेले, कट उधळला गेला. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सापडले. या चळवळीतील ८१ आरोपींपैकी ७ जणांची फाशीची शिक्षा कायम झाली. ते होते विष्णु गणेश पिंगळे, कर्तारसिंग सराबा, सरदार बक्षिससिंग, सरदार जगनसिंग, सरदार सुरायणसिंग, सरदार ईश्वरसिंग आणि सरदार हरनामसिंग. त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ ला फाशी देण्यात आलं. ( Who’s who of Indian Martyrs या शासकीय ग्रंथानुसार हा दिनांक दिला आहे) हे सर्वजण खरोखरच हसत हसत, वंदे मातरम् च्या जयघोषात फासावर गेले. फाशीची शिक्षा ऐकल्यावरचे विष्णु गणेश पिंगळे यांचे शब्द होते ‘so that’s’ all’. त्यांना शेवटची इच्छा विचारली असता त्यांनी, हातकड्या काढून, दोन्ही हात जोडून प्रार्थना करू देण्यास सांगितले. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा ठाकला असता पिंगळे यांचे शब्द होते, “हे परमेश्वरा, ज्या पवित्र कार्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान देत आहोत ते कार्य तू पूर्ण कर”. विष्णू गणेश पिंगळे यांचं धैर्य, मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची वृत्ती याचं क्लिव्हलंड या अधिकाऱ्यालाही कौतुक वाटलं होतं. या सर्वच  क्रांतिकारकांच्या कुटुंबियाचं आयुष्यही त्यांच्याबरोबरच पणाला लागत असे. विष्णू गणेश पिंगळे यांच्या नातेवाईकांचे भोगही चुकले नाहीत. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विष्णू गणेश पिंगळे, त्यांचे सहकारी आणि त्यांचे कुटुंबिय या साऱ्यांचं हे स्मरण !!

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

           संकलित माहिती

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

पाडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट

 पाडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट 

(भारतीय क्रांतिकारक)
 संपूर्ण भारतीय बनावटीचा बाॅम्ब बनवण्यापासून स्वत:च्या मुलाच्या बारशात हरिजनांसाठी खास भोजनाची व्यवस्था करण्यापर्यंत सेवा कार्य करणारे सेनापती बापट यांचा आज जयंती! 

जन्म: १२ नोव्हेंबर १८८० (पारनेर)

मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७  (बाम्बे)

टोपणनाव : सेनापती बापट

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

वडील : महादेव

आई : गंगाबाई

शिक्षण : डेक्कन कालेज पुणे

                  पांडुरंग महादेव बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सेनापती असे संबोधण्यात येऊ लागले. 

📚 *जन्म व शिक्षण*

महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे हे पुत्र होत. त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती' मिळाली. त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत. या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे. या मार्गाची सध्या पडझड झाली आहे. त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते.

*निधन* १९६७ मध्ये २८ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले. दादरच्या स्मशानातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

💁‍♂ *कार्य*

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. असे असले तरी "माझ्या बाँबमुळे एकही बळी गेला नाही. ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तरीही अलीपूर बाँब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इ. स. १९२१ पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.

इ. स. १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहावासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थानांतल्या प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

नोव्हेंबर १९१४ मध्ये सेनापती बापटांना मुलगा झाला. त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले. एप्रिल १९१५ मध्ये ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या 'चित्रमयजगत' या मासिकात नोकरी करू लागले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत. बापटांच्या पत्नीचे ४ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यानंतर सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या 'संदेश' नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. झाडू-कामगार मित्रमंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती, उल्लासकर दत्त हे भयंकर यातना सहन करीत वेडे झाले होते. हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालविली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’राजबंदी मुक्ती मंडळ' स्थापन केले होते. इ.स.१९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले.

🏵 *गौरव*

पुण्यातील १५ ऑगस्ट, इ. स. १९४७ साली ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील एका सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

🎞 *लघुपट*

सेनापती बापट यांच्या कार्यावर राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान (NCERT) यांनी एका लघु माहितीपटाची निर्मिती केलेली आहे.

      🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

         संकलित माहिती

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे


 सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे (भारतीय क्रांतिकारक)

जन्म : ८ नोव्हेंबर १८०५  देवगाव, अकोले

फाशी : २ मे १८४८ ठाणे सेंट्रल जेल

राघोजी भांगरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. 

💁‍♂ *जीवन*

राघोजींचा जन्म आदिवासी महादेव कोळी जमातीत झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणार्‍या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरिब सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.

इ.स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुळे राघोजी चिडला. नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दर्‍या, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर वरमले नाहीत. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.

ठाणे गॅझेटियराच्या जुन्या आवृत्तीत सांगितल्याप्रमाणे "ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले", असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजीच्या आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुले चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पळाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गॅझेटियरमध्ये सापडतो.

सातार्‍याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्‍न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणार्‍या सावाकरांना धडा शिकविणे या हेतूने  राघोजी खंडणी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरू झाले. नोव्हेंबर इ.स. १८४४ ते मार्च इ.स. १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने 'आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत', अशी भूमिका जाहीर केली होती. कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य, प्रमाणिकपणा व नीतिमत्ता याला त्याने धार्मिकपणाची जोड दिली. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्रंबकेश्वर, नाशिक, येथे राघोजीची भारी दहशत होती. जुन्नर येथील लढाईत मात खाल्यानंतर राघोजी कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणार्‍या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता. त्यांला इंग्रजी अधिकार्‍यांनी वकील मिळू दिला नाही. त्याने कोर्टात स्वतःच बाजू मांडली.

🔗 *फाशी*

देवजी हा त्याचा प्रमुख सल्लागार आणि अध्यात्मिक गुरुदेखील होता. मे १८४५ मध्ये गोळी लागून देवाजी ठार झाला. त्यामुळे मात्र राघोजी खचला असावा. त्याने आपला रस्ता बदलला. नंतरच्या काळात तर गोसाव्याच्या वेशात तो तीर्थयात्रा करू लागला. विठ्ठलाच्या दर्शनाला त्याने दिंडीतून जायचे ठरविले. ईश्वरी शक्तीची तलवार, चांदीचे ताईत आणि लांब केस याची साथ त्याने आयुष्यभर कधीही सोडली. २ जानेवारी १८४८ या दिवशी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता राघोजीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्याला आणले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या निधड्या छातीच्या शूर वीराचे वकील पत्र घ्यायला कोणीही पुढे आले नाही. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मांडली जाताच एकतर्फी सुनावणी झाली! राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली. राघोजी खरा वीर पुरुष होता. बंडाच्या तीन पिढ्यांचा त्याला इतिहास होता. अभिजनवादी इतिहासकारांचे या क्रांतीकारकाच्या लढ्याकडे काहीसे दुर्लक्षच झाले. ‘ फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या,’ असे त्याने न्यायाधीशांना सांगितले. ते न ऐकता सरकारने बंडाचा झेंडा फडकवणा-या या शूर वीराला २ मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात फासावर चढविण्यात आले. अकोले जि.अहमदनगर तालुक्याच्या या भूमिपुत्राच्या बंडाने पुढच्या काळातील क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच अकोले तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक चळवळीमध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो.   

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏



शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

विद्यार्थी दिवस महाराष्ट्र राज्य

 विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. इ.स. २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. शेवटी इ.स. २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

जागतिक शाई पेन (फाउंटन पेन)दिवस

जागतिक शाई पेन (फाउंटन पेन)दिवस

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुकवारी जागतिक शाई पेन (फाउंटन पेन) दिवस साजरा केला जातो.  

*फाउंटन पेनचा इतिहास.* 

बोरू/पीस हे टोकदार करून शाईत बुडवून मानव लिहिता झाला. दौतीत बोरू/पीस बुडवून लेखन करताना शाईचा प्रवाह कधी अपुरा तर कधी प्रमाणाबाहेर होत असे, तसेच शाई संपल्यावर लेखणी परत दौतीत बुडवावी लागे. पर्यायाने लेखनात खंड पडे. त्याकरिता कायम शाई बरोबर ठेवावी लागे. ती द्रवरूप असल्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना सांडण्याची शक्यता वाढत असे व हे गैरसोयीचे ठरू लागले. मग प्रयत्न सुरू झाले की शाईची बाटली बरोबर बाळगण्याऐवजी पेनमध्येच साठवून ठेवता आली तर? १८५० पासून असे पेन बाजारात आले. अशा शाईच्या पेनमध्ये धातूची निब असते. या निबमध्ये मधोमध एक भेग असते व त्याच्या मुळाशी एक भोक असते. शाई साठवण्यासाठी निबच्या विरुद्ध बाजूस नळीत द्रवरूप शाई भरलेली असते. कागदावर निब ठेवली असता शाई गुरुत्वाकर्षणाने निबकडे येते. पण हा शाईचा प्रवाह नियंत्रित नसल्याने कागदावर शाई जास्त प्रमाणात उतरत असे. शाईचा प्रवाह नियंत्रित व्हावा त्यासाठी निबकडून शाईच्या नळीकडे तीन अतिशय बारीक केशिका ((Feeder) असतात. त्या नळीत व बाहेर हवेचा दाब (वातावरणीय) समान असल्यामुळे हवा आत गेल्याशिवाय शाई बाहेर येणे शक्य नाही. त्याकरिता निबवर असलेल्या भोकाकडून एक केशिका हवा टाकीपर्यंत घेऊन जाते व हवा विरुद्ध दिशेने शाईला तीन केशिकामधून निबकडे ढकलते. तरी शाई अतिरिक्त येऊन लिखाण खराब होऊ शकते. अशा वेळी अतिरिक्त शाई रोखून धरण्याकरिता निबच्या खाली प्लास्टिकचे कलेक्टर असते. केशिकांमधून शाई येऊन कागदावर उतरण्यामागे केशाकर्षण (Capillary Action) हा सिद्धांत आहे. केशाकर्षणामुळे एखाद्या बारीक व्यासाच्या नलिकेतून द्रव गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेस म्हणजे वर चढते. एकदा शाई कागदापर्यंत आली की संसंजनशील बल (Cohesive Force) मुळे ती शाईच्या इतर रेणूंना आकर्षून घेते व हा शाईचा प्रवाह अविरत चालू राहतो. असे शाईचे पेन अतिशय लोकप्रिय झाले. ही शाई प्लास्टिक कलेक्टर असूनदेखील गळत असे. ती टिपून घेण्याकरिता पुनश्च केशाकर्षण सिद्धांताचा वापर करीत टीप कागद बाजारात आले. मात्र, शाईचा द्रावक पाणी असल्याने ती वाळायला थोडा वेळ लागे. शाईचा अखंड पुरवठा कसा करता येईल यासंबंधी प्रयत्न झाले व त्यातूनच फाउंटन पेनाचा शोध लागला. शाईचा पुरवठा सतत होणारी लेखणी तयार करावयाचे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू होते. मध्ये बार्थोलोम्यू फॉश यांनी शाईचा साठा असणारी पण गुंतागुंतीची रचना असणारी एक लेखणी तयार केली. यापेक्षा अधिक गुंतागुंतीची रचना असलेली लेखणी मध्ये जॉन शेफर यांनी तयार केली. त्याचवर्षी जे. एच्‌. ल्यूईस यांनी शाईचा साठा असणारी क्किल लेखणी तयार केली. या लेखणीलाच पहिले फाउंटन पेन असे म्हटले जाते. आधुनिक पेनाचे हे पूर्वरूप होय. 

*संकलित माहिती........

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

फ्रीमध्ये बनवा Pan Card

अफवा नाही तर सत्य आहे......

सदर माहिती जनहितार्थ जारी....

*इंटरनेटवर सहज घरबसल्या 10 मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card; जाणून घ्या प्रक्रिया*

मार्गदर्शक तत्वे (Guidelines) जरूर वाचा

 https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/index-Guidelines.html

प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे._

पॅन कार्ड (pan card) अनेक कामांसाठी, महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट मानलं जातं. इनकम टॅक्स रिटर्न करायचं असेल, बँकेत 50000 हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे.

पॅन कार्डसाठी ऑनलाईन (online pan card) अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सहज आहे. ऑनलाईन पद्धतीने अगदी 10 मिनिटांत ई-पॅन कार्ड (e-pan card) मिळवता येतं. अर्ज केल्यानंतर काही वेळात ई-पॅन कार्ड डाऊनलोड करता येईल.

*e-pan card बनवण्यासाठी कागदपत्र -*

ज्यांच्याकडे अजूनही पॅन कार्ड नाही, ते या ऑनलाईन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. e-pan card साठी आधार क्रमांक देणं गरजेचं आहे. (aadhar card number) संपूर्ण प्रक्रियेनंतर, आधार कार्ड वर ( रजिस्टर ) नोंदविण्यात आलेल्या मोबाईलवर ओटीपी जनरेट झाल्यावर e-pan card मिळेल.

*e-pan card प्रक्रिया -*

- आयकर विभागाच्या

https://www.incometax.gov.in/iec/foportal/

 https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाईटवर जा.

खालील डायरेकट  लिंकवर क्लिक करा. 

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan/getNewEpan

https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/ApplyePANThroughAadhaar.html?lang=eng

- आधार कार्ड रजिस्टर असलेल्या फोन नंबर OTP येईल.

- OTP आधार कार्डच्या सत्यतेची पडताळणी करेल.

- ई-मेल आयडी अचूक भरा.OTP  सत्यतेची पडताळणी करेल.     




- तेथे Instant PAN through Aadhaar New लिंकवर क्लिक करा.



- त्यानंतर दोन ऑप्शन ओपन होतील, त्यापैकी Get New PAN वर जा.

  

- त्यानंतर आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल.

- त्यानंतर (chaptcha code)  कॅप्चा कोड भरा.

- आधार कार्ड रजिस्टर असलेल्या फोन नंबर OTP येईल.

- OTP आधार कार्डच्या सत्यतेची पडताळणी करेल.

- ई-मेल आयडी अचूक भरा.(सक्ती नाही) मात्र भविष्यात उपयोगी पडेल.

                             

- त्यानंतर त्वरित e-pan मिळेल. ते डाऊनलोड करा.

या पॅन कार्डची कॉपी हवी असल्यास, 50 रुपयांत e-pan ची प्रिंट काढता येते.


शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

कोजागिरी पौर्णिमा

 


कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य 

घेऊन येणारी ठरो! ही आमची कामना 

चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी 

कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी 

मंद प्रकाश चंद्राचा 

त्यास गोड स्वाद सुधाचा 

विश्वास वाढू द्या नात्याचा 

त्यात असूद्या गोडवा साखरेचा 

आपण व आपल्या परिवारास 

माझ्यातर्फे गोड गोड शुभेच्छा...

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. काही मान्यतांनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली, असे सांगितले जाते.चातुर्मासात अनेकविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील नवरात्र, विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित असल्याचे दिसून येते. वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते.

काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणांमुळेच 'नक्षत्राणामहं शशी' म्हणजे 'नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे', असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे. कौजागिरी म्हणजेच शरद पौर्णिमा कधी आहे? महत्त्व, मान्यता, परंपरा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेऊया...

कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून 'को जागर्ती'? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात. मसाला दूध पिण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात, अशी मान्यता असल्याचे सांगिले जाते. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.

भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी येतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.

कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. जी माणसे जागरण करत नाहीत, त्यांच्या दारावरून लक्ष्मी देवी परत जाते. कोजागरीला केलेले लक्ष्मी पूजन विशेष मानले जाते. यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते. लक्ष्मी देवीच्या आशिर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णूसहस्रनाम आदींचे पठण करणे शुभ मानले जाते. दमा किंवा अस्थमा यांसारख्या आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.

शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना अर्पण करून आप्तेष्टांना देतात. विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. द्वापार युगात वृंदावनमध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रासलीला केली होती. वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात, अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.कोजागिरीच्या रात्री, द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त कोजागिरीला रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना या दिवशी केली जाते. 

अनेक ठिकाणी कोजागिरीनिमित्त संगीतसंध्येचे आयोजन केले जाते. चंद्रावर आधारित गाण्यांनी कोजागिरीची सायंकाळ सुरेल होते. उगवला चंद्र पुनवेचा, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र आहे साक्षीला, चंद्रिका ही जणू, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, चांदण्यात फिरताना, तोच चंद्रमा नभात, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, हे सुरांनो चंद्र व्हा...अशी कित्येक भावगीते आपल्या मनातही चांदणे शिंपडतात. 

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

वसंत रामजी खानोलकर



वसंत रामजी खानोलकर
जन्मतारीख: १३ एप्रिल, १८९५
मृत्यूची तारीख: २९ ऑक्टोबर, १९७८
मृत्यूस्थळ: मुंबई
शिक्षण: लंदन विश्वविद्यालय
पुरस्कार: पद्मभूषण पुरस्कार
आर. खानोलकर एक भारतीय पॅथॉलॉजीस्ट म्हणून ओळखले जाणारे वसंत रामजी खानोलकर. कर्करोग, रक्त गट आणि कुष्ठरोगाच्या साथीच्या रोगाबद्दल आणि समजूतदारपणामध्ये त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याला बर्‍याचदा "भारतातील पॅथॉलॉजी Medical मेडिकल रिसर्चचे फादर" म्हणून संबोधले जाते.
भारतात आधुनिक वैद्यक संशोधनाची पायाभरणी करणारे आघाडीचे वैद्यकशास्त्रज्ञ डॉ. वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म रत्नागिरीजवळच्या मठ या लहानशा गावात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारच्या लष्करात शल्यचिकित्सक (सर्जन) होते. त्या निमित्ताने खानोलकर कुटुंबाचे वास्तव्य पूर्वीच्या अविभाज्य हिंदुस्थानातील, सध्या पाकिस्तानात असलेल्या क्वेट्टा या शहरात होते. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेथेच पूर्ण झाल्यावर खानोलकर ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून एम.बी.बी.एस. ही पदवी उत्तम गुणांनी मिळवल्यावर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल व मेडिकल स्कूल या संस्थेत त्यांनी विकृतिशास्त्र (पॅथॉलॉजी) या विषयात विशेष प्रावीण्य मिळविले. त्यापूर्वी सतत तीन वर्षे विकृतिशास्त्र या विषयात एकाही विद्यार्थ्यास परीक्षेत यश मिळाले नव्हते. त्यानंतर १९२३ साली विकृतिशास्त्र विषय घेऊन एम.डी. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान एकाच विद्यार्थ्यास मिळाला. हा बहुमान मिळवणारी व्यक्ती म्हणजे खानोलकर. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे हे यश केवळ देदीप्यमान होते.त्यांच्याकडे अनेक मूल्यवान आणि दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह होता. बहुधा वसंत खानोलकरांना वैद्यक आणि भाषा या विषयांची आवड वडिलांकडूनच मिळाली असावी.
वसंत खानोलकरांनी लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथेच ते सी. जी. पंडित यांना पहिल्यांदा भेटले. त्याच वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडन विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केली आणि १९१८मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली. १९२३ मध्ये ते रोगनिदानशास्त्रात (पॅथॉलॉजी) एम.डी. झाले. या काळात त्यांनी मूलभूत विज्ञान आणि वैद्यकीय संशोधनात अमूल्य अनुभव मिळवला. ते सर्वात कमी वयाचे ग्रॅहम रिसर्च स्कॉलर होते. भारतात परत येऊन ते ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोगनिदानशास्त्र शिकवू लागले. शिक्षणासाठी उपयुक्त विविध नमुन्यांचे संग्रहालय त्यांनी सुरू केले. रोगनिदानशास्त्राच्या पद्धतशीर शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. रोगनिदानशास्त्रातील संशोधनावरही त्यांनी विशेष भर दिला. पाश्चात्य देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत भारतीय शिक्षण कमी पडू नये म्हणून त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक बदल सुचवले. वैद्यकीय शिक्षणामध्ये मूलभूत विज्ञान, प्रायोगिक जीवशास्त्र (एक्सपेरिमेंटल बायोलॉजी), जीवरसायनशास्त्र, जीवभौतिकशास्त्र तसेच संख्याशास्त्र यांचे महत्त्वाचे स्थान त्यांनी ओळखले होते. हे तत्त्वज्ञान त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न केला. खानोलकरांनी रोगनिदानशास्त्राचे शिक्षक या नात्याने या विषयाच्या अभ्यासाला त्यांनी नवीन दिशा दिली. खानोलकरांनी सेठ जी. एस. मेडिकल महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयात कामाच्या एका वेगळ्या परंपरेची सुरुवात केली. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर एक अत्युत्तम वैद्यकीय संस्था असण्याचा मान मिळाला. जैवभौतिकी, उपयोजित जीवशास्त्र इत्यादी विषयांची सुरुवात त्यांनी मुंबई विद्यपीठात केली. या कालावधीत खानोलकरांना कर्करोग आणि कुष्ठरोग यांच्या अभ्यासामध्ये विशेष कुतूहल व आवड निर्माण झाली. तेव्हा त्यांनी शिक्षकी पेशातून अंग काढून घेतले आणि टाटा मेमोरियल रुग्णालयात प्रमुख रोगनिदानतज्ञ म्हणून १९४१ मध्ये ते रुजू झाले. त्यांनी कर्करोग, कुष्ठरोग, पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र, मानवी अनुवंशशास्त्र या विषयात संशोधन केले.
खानोलकर १९४१-१९५१ या काळात टाटा मेमोरियल रुग्णालयात अर्बुदाच्या (ट्युमर) तपासणीच्या कामात व्यस्त राहिले. त्यांच्या संशोधनाचा विषय भारतातील कर्करोग हा होता. भारतात कर्करोग आहे का, त्याचे कोणते प्रमुख प्रकार आहेत, हे शोधण्यासाठी त्यांनी रुग्णालयातील आकडेवारीचा अभ्यास केला. कर्करोगासाठी कारणीभूत काही घटक/सवयी, रोगपरिस्थितीविज्ञान (एपिडेमियॉलॉजी) यांचा त्यांनी अभ्यास केला. या संदर्भातील त्यांचे शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले. भारतातील कर्करोगासंदर्भातील त्यांच्या अग्रगण्य कामाबद्दल त्यांना १९४७मध्ये आंतरराष्ट्रीय कर्करोग युनियनचे (इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट कॅन्सर) सदस्यत्व बहाल करण्यात आले.
कर्करोगावर संशोधन करण्यासाठी भारतामध्ये तंत्रज्ञान आणि साधनसामग्री उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या मागणीचे मूल्यमापन एका खास सरकारी समितीने केले. या कामासाठी अमेरिकेहून इ. व्ही. कॉद्रे यांनाही बोलावण्यात आले होते. सर्वानुमते खानोलकरांना संशोधनासाठी एक राष्ट्रीय प्रयोगशाळा देण्यात यावी असे ठरले. अखेर, १९५२ मध्ये इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (आय. सी.आर.सी.) सुरू करण्यात आले. यासाठी अनेक जागतिक संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळाले, त्यात रॉकफेलर फाउंडेशन, जागतिक आरोग्य संघटना होत्या.
कर्करोगाव्यतिरिक्त खानोलकरांनी कुष्ठरोगावरही संशोधन केले. पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र यावर कार्य करण्यामध्ये खानोलकरांचा भर होता. या त्यांच्या उपक्रमातूनच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कुटुंबनियोजनाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. खानोलकर ७ वर्षे या समितीचे अध्यक्ष होते. इंडियन ॲसोशिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायॉलॉजिस्ट या संघटनेची स्थापना त्यांनी केली. भारतात वैद्यकीय संशोधन सुरू करण्याचे श्रेय खानोलकर व त्यांचे जवळचे मित्र सी. जी. पंडित आणि बी. बी. दीक्षित यांना जाते. खानोलकर अनेक भाषा पारंगत होते. मराठी व इंग्रजीप्रमाणेच ६ भारतीय आणि जर्मन, फ्रेंच, उर्दू, पर्शियन ४ यूरोपियन भाषा ते बोलू आणि वाचू शकत होते.
खानोलकरांनी वैद्यकशास्त्रातील वैज्ञानिक चळवळ उभारली. यातूनच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ (एन.आय.आर.आर.एच.), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी या संस्था निर्माण झाल्या. या संस्थांचे तसेच भाभा अणू संशोधन केंद्रातील बायोमेडिकल ग्रूपचे बीज त्यांच्या प्रेरणेने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सुरुवातीच्या विकृतिशास्त्र प्रयोगशाळेत व नंतर कर्करोग संशोधन केंद्रातच रोवले गेले. देशापुढील वैद्यकीय समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी अचूक दृष्टी असणाऱ्या खानोलकरांना देश-विदेशांत अनेक सन्मान मिळाले. इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट कॅन्सर (यु.आय.सी.सी.) या जागतिक संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अणुविभाजनातून उद्भवणाऱ्या वाईट परिणामांपासून संरक्षण करण्याबाबतच्या वैज्ञानिक समितीवर भारताचे प्रतिनिधी व नंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. अमेरिका, युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील वैज्ञानिकांनी त्यांचा सन्मान केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पदवीने गौरविले. ते १९६० ते १९६३ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. मराठी विज्ञान परिषदेने आपल्या १९६७ सालच्या मराठी विज्ञान संमेलनात त्यांचा सन्मान केला होता.
कर्करोग आणि कुष्ठरोग यावर त्यांनी तीन पुस्तके आणि शंभरहून जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
खानोलाकारांचा मृत्यू मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात झाला.
भारत सरकारने खानोलकरांना पद्मभूषण देऊन गौरविले. ते इंडियन ॲसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च कमिशनचे अध्यक्ष, इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरचे निदेशक, कर्करोग आणि कुष्ठरोगावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीचे सदस्य आणि नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसने खानोलकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वक्तृत्व स्पर्धा सुरू केली.

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

डॉ भालचंद्र नीळकंठ पुरंदरे




डॉ भालचंद्र नीळकंठ पुरंदरे - वैद्यकतज्ञ
*जन्मदिन - २७ ऑक्टोबर १९११*
सुप्रसिद्ध भारतीय प्रसूतिविद्याविशारद आणि स्त्रीरोगविज्ञ. स्त्रीरोगविज्ञानात त्यांनी घातलेली मौलिक भर जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी आजपावेतो २५,००० पेक्षा जास्त योनिमार्गाद्वारे गर्भाशयोच्छेदन आणि योनीमार्गाद्वारे वंध्यीकरण शस्त्रक्रिया केल्या असून तो एक असाधारण उच्चांक गणला जातो. त्यांनी स्त्रीरोगाविषयक काही शस्त्रक्रियांच्या बाबतीत स्वतंत्र तंत्र शोधून वापरले आहे.
डॉ. भालचंद्र नीळकंठ पुरंदरे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील डॉ. नीळकंठ अनंत पुरंदरे प्रसिद्ध स्त्री-रोगतज्ज्ञ होते व त्यांचे गिरगाव चौपाटीला स्वत:चे रुग्णालय होते. डॉ. भालचंद्र पुरंदरे यांना वैद्यकीय शिक्षणाचे बाळकडू घरातच मिळाले होते. साहजिकच, त्यांचा कल प्रसूती व स्त्री-रोगविज्ञानाकडे होता. त्यांचे इंटरसायन्सपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये झाले. इंटरसायन्सला उत्तम गुण मिळवून मुंबईच्या जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामधून ते एम.बी.बी.एस. झाले. हुशार विद्यार्थ्यांत त्यांची गणना असल्यामुळे त्यांना बऱ्याच शिष्यवृत्त्याही मिळाल्या होत्या. १९३७ साली त्यांना प्रसूतिविज्ञान व स्त्री-रोगविज्ञान या विषयांत एम.डी. पदवी मिळाली. १९३९ साली इंग्लंडमधील एडिंबरा येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची एफ.आर.सी.एस. पदवी मिळाली. मुंबईत परत आल्यावर कॉलेज ऑफ फिजिशियन्स व सर्जन यांची अभिछात्रवृत्ती मिळवून ते एफ.सी.पी.एस. झाले. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात १९४१ ते १९४५ स्त्री-रोगशास्त्र व प्रसूतिशास्त्र या विभागात साहाय्यक सन्माननीय विशेषज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९५७ साली त्यांनी त्याच विभागाचे प्रमुख म्हणून काम केले.
त्यांच्याच प्रयत्नामुळे प्रसूतिविद्या व कुटुंबनियोजन या विषयाच्या संशोधनाकरिता खास संशोधन केंद्र के.ई.एम.मध्ये स्थापन झाले. डॉ. पुरंदरे त्याचे संचालक होते. त्या केंद्राला त्यांच्या वडिलांचे, डॉ. नीळकंठ अनंत पुरंदरे यांचे नाव दिले गेले. १९६९ साली निवृत्त होईपर्यंत ते विभागप्रमुख व संशोधन केंद्र संचालक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जननमार्गासंबंधी अनुप्रयुक्त जीवविज्ञानाच्या एम.डी. व पीएच.डी. या पदव्युत्तर परीक्षांच्या अभ्यासाची सोय करण्यात आली. ते वाडिया रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी होते. याशिवाय बॉम्बे रुग्णालय व पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय यांचे सन्माननीय विशेषज्ञही होते.
त्यांचे विशेष संशोधन म्हणजे गर्भाच्या खांद्याच्या (अ‍ॅण्टिरियर शोल्डर) हालचालीवरून प्रसूतीच्या प्रगतीचा अंदाज घेणे. गर्भाशयाच्या स्खलनाची शस्त्रक्रिया त्यांनी सुधारली. पोटाच्या पुढच्या भागातील स्नायूच्या आवरणाचा (अ‍ॅपोन्युरोसिस) दोरीसारखा उपयोग करून, गर्भाशय या दोरीने वर उचलून पोटाच्या पुढच्या भागाला बांधून ठेवायचे म्हणजे ते खाली घसरणार नाही, असे शस्त्रक्रियेचे स्वरूप असे. या शस्त्रक्रियेनंतर जर स्त्रीला मूल हवे असेल, तर ते होऊ शकेल. प्रसूतीच्या वेळी जर काही कारणास्तव प्रसूती नैसर्गिकरीत्या होत नसेल, तर बाळाच्या डोक्याला इजा न होता प्रसूती होऊ शकेल.
कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया योनिमार्गे करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. या पद्धतीत फॅलोपियन बीजवाहिनी योनिमार्गे छोट्या छिद्रातून काढायची व ती दुमडून, तिला टाके मारून पुन: पोटात ठेवायची. या पद्धतीमुळे स्त्रीचे रुग्णालयातील वास्तव्य कमी झाले व नंतर मूल हवे असल्यास ते टाके काढून बीजवाहिनी मोकळ्या करू शकतात. याला ‘पुरंदरे तंत्र’ म्हणतात.
गर्भाशय काही कारणास्तव काढावे लागले, तर डॉ.पुरंदरेंनी ते योनिमार्गे काढण्याची पद्धती चालू केली. यामध्ये कमीतकमी रक्तस्त्राव होतो व पोटावर एरवी होणारा व्रणही होत नाही. या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे त्यांनी स्वत:च तयार केली. ती सर्व त्यांच्याच नावाने प्रसिद्ध आहेत.
डॉ. पुरंदरेंनी कुटुंबनियोजनासाठी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या ‘शांतिलाल शाह समिती’चे ते सभासद होते. डॉ.पुरंदरेंच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यात आला. डॉ. पुरंदरेंना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांतील काही मानसन्मान : अधिष्ठाता- वैद्यकीय विद्याशाखा, मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष- कॉलेज ऑफ फिजिशियन्स अ‍ॅण्ड सर्जन्स, मुंबई, सन्मान्य सदस्य- एडिंबरो ऑब्स्टेटिक्स सोसायटी, अध्यक्ष- इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनॅकोलॉजी अ‍ॅण्ड ऑब्स्टेटिक्स, सन्मान्य सदस्य- इंडियन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, अध्यक्ष- इंडियन अकॅडमी ऑफ सायटॉलॉजिस्ट. स्त्री-रोगविज्ञान व प्रसूतिविद्या या विषयांवर त्यांचे बरेच संशोधन असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांतून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ते सहलेखक असलेल्या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांना संगीतात खूप रस होता व ते उत्तम तबलावादक होते. त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे.
कुटुंबनियोजनांसंबंधी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या शांतिलाल शाह समितीचे ते एक सभासद होते. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ किताब १९७२ मध्ये बहाल करण्यात आला.
त्यांना पुढील मानसन्मान मिळाले आहेत : अधिष्ठाता, वैद्यकीय विद्याशाखा, मुंबई विद्यापीठ अध्यक्ष, कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स, मुंबई सन्मान्य सदस्य, एडिंबरो ऑब्‌स्टेट्रिक सोसायटी, एडिंबरो अध्यक्ष, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनेकोलॉजी अँड ऑब्‌स्टेट्रिक अध्यक्ष, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायटॉलॉजिस्ट अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑब्‌स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया सन्मान्य सदस्य, इंडियन ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस. स्त्रीरोगविज्ञान आणि प्रसूतिविद्या या विषयांवर त्यांनी बरेच संशोधन केले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांतून त्यांचे सु. १२५ संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रसूतिविद्येवरील एका ग्रंथाचे ते सहलेखक असून या ग्रंथाच्या १९७६ पर्यंत १० आवृत्त्या निघाल्या होत्या.

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

भगिनी निवेदिता

*🙏भगिनी निवेदिता🙏🌴*

*जन्म:-* २८ ऑक्टोबर १८६७* (डेंगानेन,आयरलैण्ड)

*मृत्यू:- १३ ऑक्टोबर १९११* (दार्जिलिंग, भारत)  

या लेखिका,शिक्षिका,सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. मार्गारेट एलिझाबेथ नोबल असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते. भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्याना संन्यासदीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे झाले. उत्तर आयर्लंड येथे मार्गारेटचा जन्म झाला. (सन २०१६-१७ हे निवेदितांचे जन्मशताब्दी वर्ष होते.) नोबल कुटुंब हे धर्मजिज्ञासा, सुशीलता आणि सात्त्विकता यांच्याविषयी प्रसिद्ध होते. मार्गारेटचे प्राथमिक शिक्षण मेंचेस्टर येथे झाले. स्वदेशाविषयी प्रेम, स्वदेश स्वातंत्र्याविषयी लढा आणि जगातील विविध प्रश्न आणि तेथे उत्पन्न होणाऱ्या विविध विचारसरणी यांचा परिणाम तिच्या मनावर होत होता. वडिलांच्या निधनानंतर तिने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तीत लंडन येथे आली व शिक्षिका म्हणून काम करू लागली. हसत-खेळत बालशिक्षण या नव्या प्रयोगाकडे तिचे लक्ष वेधले गेले आणि तिने त्याचा सखोल अभ्यास केला. शिक्षण क्षेत्रातील अधिकाधिक प्रगती कळावी यासाठी तिने 'सिसेम' मंडळाचे सदस्यत्व घेतले आणि त्यात सक्रिय सहभागही घेतला. इ.स. १८९४ च्या सुमारास क्रांतिकार्यासाठी 'सिनफेन' नावाचा पक्ष कार्यरत झाला आणि मार्गारेटने त्याचे सदस्यत्व घेतले.

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्त्वविचार मांडून स्वतःची छाप उमटविली आणि त्यांचे सर्वदूर कौतुक झाले. त्यानंतर काही काळाने स्वामीजी लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जाऊ लागली. तिला स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे आकर्षण वाटू लागले. एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे ती आदराने पाहू लागली. आणि त्यामुळेच ती त्यांना अल्पावधीतच सद्गुरू असे संबोधू लागली. मानवामध्ये चारित्र्य घडण करणारे शिक्षण स्वामीजीना अपेक्षित होते, त्यासाठी महान निश्चयाने कार्य करू शकणाऱ्या व्यक्ती त्यांना हव्या होत्या. त्यांच्या या आवाहनाला मार्गारेटने प्रतिसाद दिला आणि स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची मनापासून तयारी दाखविली. २८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट भारतात आली. दरम्यानच्या काळात कलकत्यात राहून तिने हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्णांच्या पत्नी माता शारदादेवी यांचे आशीर्वाद तिला आणि स्वामींच्या अन्य परदेशी महिला शिष्याना लाभले. २९ मार्च १८९८ ला मार्गारेटला दीक्षा लाभली .स्वामीजींनी तिचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले निवेदिता म्हणजे ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली ! स्वामाजीनी तिला सांगितले होते ही हिंदुस्थानासाठी कोणाही युरोपियन व्यक्तीला काम करायचे असेल तर त्याने पूर्ण हिंदू झाले पाहिजे. त्याने हिंदू चालीरीती, पद्धती ग्रहण केल्या पाहिजेत. ही साधना अवघड होती पण निवेदितानी आपलेपणाने ह्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि हिंदुस्थान हे तिचे आजीवन कार्यक्षेत्र बनले.

इ.स. १८९८मध्ये मध्ये कलकत्त्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निवारणाच्या कामी स्वामीजींनी निवेदितांच्या मदतीने केले. या कार्यामुळे तेथील लोकांच्या मनात भगिनी निवेदितांबद्दल मोठा विश्वास उत्पन्न झाला. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात निवेदितांचे शिक्षण सुरू होतेच. हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांतील विविध संकल्पना स्वामीजी तिला उलगडून दाखवीत होते. नोव्हेंबर १८९८ मध्ये शारदामाता यांच्या हस्ते निवेदितांच्या बालिका विद्यालयाचे उद्‌घाटन झाले. लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठीच ही शाळा होती. या शाळेत मुलीना काय काय शिकविले जावे याविषयी स्वामीजी निवेदितांना मार्गदर्शन करीत असत. चित्रे काढणे, मूर्ती बनवणे, शिवणे, विणणे अशा विविध गोष्टी शिकून मुलींच्या हृदय आणि बुद्धीचा एकत्र व व्यवहार्य विकास कसा होईल असा विचार या शाळेने राबविला. निवेदिताने कलकत्त्यातील विद्वान लोकांच्या ओळखी करून घेतल्या. ती समाजात देत असलेली व्याख्याने हे या ओळखीचे साधन ठरले. तिने 'काली' या विषयावर दिलेल्या व्याख्यानाने तर ती समाजात प्रसिद्ध झाली आणि हिंदू धर्म तिने अंतर्बाह्य स्वीकारला आहे याची समाजातील लोकांनाही जाणीव झाली. निवेदिता बेलूर येथील आश्रमातील साधकांना शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शिक्षणशास्त्र असे विषयही शिकवीत असे. नैष्ठिक ब्रह्मचारिणी दीक्षा तिला मार्च १८९९ मध्ये प्राप्त झाली त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी तिला सांगितले की "मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण". सन १९०१ पासून निवेदितांनी हिंदुस्थानासंबंधी व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि लेखनकार्यही केले. या लेखनाचे जे पैसे मिळत ते बालिका विद्यालयासाठी वापरले जात. त्यांचे हे सर्व कार्य पाहून १९०२ साली त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना मानपत्रही देण्यात आले. परकीय म्हणून हा सत्कार नव्हता तर ही विदुषी स्त्री म्हणजे सर्व हिंदू समाजाच्या सुख-दुःखाशी तादात्म्य पावलेली हिंदू कन्या, धर्मभगिनी अशा भूमिकेतून झाला. या सर्व घटनाक्रमात निवेदिताच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली आणि ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांची चिरविश्रांती. ४ जुलै १९०२ ला स्वामीजी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यांचे निधन ही निवेदिताच्या आयुष्यातील महत्त्वाचीच घटना होती. स्वामीजींची राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम आता निवेदितांनी हाती घेतले. 'मी त्यांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विवेकानंदांची, त्यांच्या अंतरंगाची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही' असा पण करून निवेदितांनी कार्यारंभ केला. हिंदुस्थानचे पुनरुज्जीवन, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य याची आस बंगाली युवकांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य निवेदिताने हाती घेतले. निवेदितांचे हे जहाल विचार आणि हालचाली ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आल्या. मार्च १९०२ पासून सरकारतर्फे त्यांच्यावर गुप्तहेरांची पाळत राहू लागली. त्यांची पत्रे फोडली जाऊन वाचण्यात येऊ लागली. निवेदितानी 'आशिया खंडाचे ऐक्य', आधुनिक विज्ञान आणि हिंदू मन ' अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. भारतभर चालू असलेल्या क्रांतिकार्याची ओळख आता निवेदितांना झाली होती. योगी अरविंद यांचाही क्रांतिकार्यात विशेष सहभाग होता. त्यांना भेटल्यावर निवेदिताने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा तर केलीच पण त्याच्या जोडीने एकत्रितपणे क्रांतिकार्याची धुराही सांभाळण्याचे ठरविले. अनुशीलन समितीची स्थापना झाल्यावर युवकांच्या गटाला क्रांतिकार्यासाठी निवेदिता मार्गदर्शन करीत. डॉन सोसायटीच्या माध्यमातूनही क्रांतिकार्य चाले. या कार्यातून बंगाली तरुणांना स्वदेशभक्तीचे शिक्षण दिले जाई. निवेदिता या गटालाही मार्गदर्शन करीत असत.आपल्या युवकांसमोर आणि हिंदुस्थानासमोरच आपल्या राष्ट्राचे चिह्न असावे या भूमिकेतून निवेदिताने एक वज्रचिह्न असलेला ध्वज तयार केला. सन्मान, पावित्र्य, शहाणपण, अधिकार आणि चेतना यांचा बोध करून देणारा हा ध्वज! स्वदेशीच्या आंदोलनात निवेदिताने स्वदेशाचा पुरस्कार करणारे लेख लिहिले. घरोघरी जाऊन स्वतः स्वदेशी वस्तूंचा प्रसारही केला.

रवीन्द्रनाथ ठाकूर, त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ ठाकूर, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू आणि अबला बसू, यासारख्या अनेक मंडळींशी निवेदितांचे अतिशय सौहार्दपूर्ण नाते होते. जगदीशचंद्र बसूंची मानसकन्या असे निवेदितांचे स्थान होते.Response in the Living and Non-Living हा बसूंचा पहिला ग्रंथ लिहिण्याच्या आणि संपादित करण्याच्या कामी निवेदितांचे खूप साहाय्य झाले होते. निवेदितानी बसूंच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख लिहून त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून दिली. बसूंच्या टिपणाच्या आधारे निवेदितांनी 'Plant Response as a Means of Physiological Investigation' हा ग्रंथ पूर्ण लिहिला.जगदीशचंद्र बसूंची 'Comparitive Electro-Psysiology', 'Researches on Irritability of Plants" ही पुस्तकेही निवेदितानेच लिहिली आहेत. {२}

भारतीय कलेतील प्राचीन परंपरा,पूर्णत्वाच्या कल्पना, चैतन्य,सर्जनशीलता यांच्याशी निवेदिता एकरूप झाल्या होत्या असे म्हणता येईल.पाश्चात्य कलेची परिमाणे लावून भारतीय कलेची समीक्षा करणे थांबले पाहिजे असे निवेदिताने आग्रहाने नोंदविले. संस्कृती व कला हे निवेदितांचे आस्थेचे विषय होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करून त्याद्वारे समाज परिवर्तन आणि राष्ट्र जागरण करता येईल असे निवेदितांचे मत होते.

१३ ऑक्टोबर १९११ रोजी निवेदिता यांनी आपला इहलोकीचा प्रवास संपविला. निवेदितांचे कार्य युवकांना आणि युवतींना सतत प्रेरणादायी असेच आहे.{२} भगिनी निवेदिता यांचा विचार- कला, विज्ञान, शिक्षण उद्योग आणि व्यापार या सर्व गोष्टी यापुढे दुसऱ्या कोणत्या हेतूसाठी नव्हेत, तर भारताच्या, मातृभूमीच्या पुनर्उभारणीच्या हेतूसाठीच करायला हव्यात . [१] मातृभूमीच्या पुनर्घडणीसाठी कलेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे.

चरित्रे आणि निवेदितांचे चिंतनविश्व संपादन करा

भगिनी निवेदिता यांच्याविषयीची काही पुस्तके :

अग्निशिखा भगिनी निवेदिता (प्रा. प्रमोद डोरले)

कर्मयोगिनी निवेदिता -डॉ सुरेश शास्त्री

क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता - मृणालिनी गडकरी

चिंतन भगिनी निवेदितांचे : कला आणि राष्ट्रविचार (अदिती जोगळेकर-हर्डीकर)

चिंतन भगिनी निवेदितांचे : भारतीय मूल्यविचार (डॉ. सुरुची पांडे)

चिंतन भगिनी निवेदितांचे : शिक्षणविचार (डॉ. स्वर्णलता भिशीकर)

चिंतन भगिनी निवेदितांचे : स्वातंत्र्यलढा सहभाग आणि चिंतन (प्रा. मृणालिनी चितळे)

भगिनी निवेदिता (म.ना. जोशी)

भगिनी निवेदिता (सविता ओगीराल)

भगिनी निवेदिता (सुरेखा महाजन)

भगिनी निवेदिता - एक चिंतन (दिलीप कुलकर्णी, संध्या गुळवणी, चारुता पुराणिक)

भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान (डाॅ. सुभाष वामन भावे, डाॅ' अश्विनी सोवनी)

भगिनी निवेदिता : संक्षिप्त चरित्र व कार्य (काशिनाथ विनायक कुलकर्णी).

भारताच्या पाऊलखुणांवर ... -डॉ. सुरुचि पांडे

विवेकानंद कन्या - भगिनी निवेदिता (वि.वि. पेंडसे)

शतरूपे निवेदिता -अनुवादक - साने गुरुजी (डॉ. सुरुचि पांडे, डॉ.य.शं.लेले )                        

   🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

             *स्त्रोत पर माहिती

आगामी झालेले