नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, २४ जून, २०२१

विरांगणा राणी दुर्गावती



विरांगणा राणी दुर्गावती
जन्म : ५ ऑक्टोबर १५२४ (कालंजर किल्ला, बांदा,उत्तर प्रदेश, भारत)
मृत्यू : २४ जून १५६४ (एलिचपूर, महाराष्ट्र, भारत)

धर्म : गाेंडी धर्म
पती : दलपत शाह
अपत्ये : वीर नारायण

राणी दुर्गावती यांचा जन्म प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांचे कुटुंबात झाला. कालंजर किल्ला (बांदा, उत्तर प्रदेश, भारत) हे त्यांचे जन्मस्थान होय. महंमद गझनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले. राणा विद्याधर यांच्या शिल्पकलेवरील प्रेमाची प्रचिती जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर व कालंजर किल्ल्याकडे पाहून येते. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या वंशपरंपरगात धैर्य व कलाभक्तीच्या परंपरेला आणखी प्रतिष्ठा लाभली.
⛲ *१५४२*
१५४२ साली, राणी दुर्गावती यांचा विवाह, गोंड राजघराण्यातील राजा संग्राम शाह यांचे सुपुत्र दलपत शाह यांचेशी बऱ्याच संघर्षानंतर झाला. या विवाहामुळे चंडेल व गोंड राजघराणी एकत्र आली. याच कारणामुळे शेर शाह सुरीचा पाडाव करते समयी राणा किरत सिंह यांना आपले जावई दलपत शाह यांचेकडून मदत मिळाली.
🎠 *१५४५*
इ.स. १५४५ साली राणी दुर्गावती यांनी एका मुलास जन्म दिला. त्यांनी मुलाचे नाव वीर नारायण ठेवले. इ.स. १५५० च्या सुमारास दुर्गावतींचे पति दलपत शाह यांचे निधन झाले. वीर नारायण त्या वेळेस वयाने खूपच लहान असल्याने गोंड राज्याची सूत्रे राणी दुर्गावतींनी आपल्या हाती घेतली. दिवाण किंवा प्रधान मंत्री व मंत्री मान ठाकूर यांनी राणी दुर्गावती यांना यशस्वी व प्रभावी राज्यकारभारासाठी मदत केली. नंतर राणीने आपली राजधानी सिंगौरगडावरून हलवून चौरंगगडावर नेली. सातपुडा पर्वतरांगांमधील या किल्ल्याला राजकीय महत्त्व होते.
🏇 *१५५६*
शेर शाहच्या मृत्यूनंतर सुजात खान याने माळवा प्रांतावर कब्जा केला. त्याच्यानंतर इ.स. १५५६ मधे त्याचा मुलगा बाज बहादूर गादीवर आला. राज्यकारभाराची धुरा सांभाळताच त्याने राणी दुर्गावतीवर हल्ला केला पण या युद्धात त्याचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर बाज बहादूरला गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही व राणी दुर्गावतीचे नाव अतिशय प्रसिद्ध झाले.
🤺 *१५६२*
१५६२ मधे अकबर राजाने माळवा प्रांताचा राजा बाज बहादूर याचा पराभव केला व माळवा प्रांत मुघल साम्राज्याखाली आणला. यामुळे आपसूकच राणी दुर्गावतीच्या साम्राज्याची हद्द, मुघल साम्राज्याच्या हद्दीला स्पर्श करू लागली.
रेवा साम्राज्याच्या रामचंद्र राजाचा पराभव करणारा, राणीचा एक समकालिन मुघल सेनापती, ख्वाजा अब्दुल माजिद असफ खान हा अतिश्य महत्वाकांक्षी मनुष्य होता. राणीच्या साम्राज्यातील समृद्धीने हा प्रदेश आपल्या अंकित करण्याची त्याची लालसा बळावली आणि अकबर राजाच्या परवानगीने त्याने राणीच्या राज्यावर हल्ला केला.
राणीला जेव्हा असफ खानच्या आक्रमणाविषयी कळलं, तेव्हा त्यांचे दिवाण ब्योहर आधार सिंह यांनी मुघल सैन्यबलाविषयी पूर्ण कल्पना दिली. मात्र राणीने आपल्या सर्वशक्तीनीशी असफ खानला तोंड द्यायचं ठरवलं. अपमानित जगण्यापेक्षा सन्मानाने मृत्यूला कवटाळणं त्यांना जास्त पसंत होतं.
बचावात्मक लढा देता यावा म्हणून त्या नराई ला गेल्या. या प्रदेशाच्या एका बाजूस गौर व नर्मदा नदी आणि एका बाजूस पर्वतांची रांग होती. हे एक असमान युद्ध होतं. एका बाजूला आधुनिक शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकांचे अफाट सैन्यदळ व दुसर्‍या बाजूला जुनी हत्यारे चालवणारे अपुरे अप्रशिक्षित सैनिक. राणीचा फौजदार अर्जुन दास युद्धात कामी आला व मग राणीने बचावाच्या या लढाईमधे आघाडी घेतली. शत्रूच्या सैन्याने घाटात प्रवेश केल्यावर राणीच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. दोन्ही बाजूला काही सैनिक मेले पण राणीचा या युद्धात विजय झाला. घाटात शिरलेल्या मुघल सैन्याचा तिने पाठलाग केला व ती बाहेर आली.

⌛ *१५६४*
आता राणीने आपल्या सल्लागारांसोबत युद्धनीतीची चर्चा केली. राणीचं मत होतं की शत्रूवर रात्री हल्ला करावा म्हणजे तो कमजोर पडेल पण राणीच्या सल्लागारांनी याला नकार दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी असफ खानाने अवाढव्य तोफा युद्धासाठी आणल्या. राणी आपल्या सरमन नावाच्या हत्तीवर स्वार झाली आणि युद्धाला सामोरी गेली. तिचा मुलगा राजपुत्र वीर नारायण यानेदेखील या युद्धात भाग घेतला होता. त्याने तीन वेळा मुघल सैन्याची पिछेहाट केली होती पण एके क्षणी तो जखमी झाल्यामुळे एका सुरक्षित स्थळी तो मागे फिरला. या युद्धादरम्यान राणीला देखील एका बाणामुळे कानावर जखम झाली. दुसरा बाण थेट त्यांच्या गळ्यात घुसला व त्यांची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या युद्धात पराभव अटळ आहे. त्यांच्या माहूताने त्यांना युद्धभूमीवरून परत फिरण्याचा सल्ला दिला पण राणीने तो मानला नाही. त्यांनी आपला खंजिर काढला व स्वत:चे जीवन संपवले. तो दिवस होता २४ जून १५६४. त्यांचा मृत्यू दिन भारतामधे शहीदांचा दिवस म्हणून २४ जूनला साजरा केला जातो.
🏛 १९८३ साली, मध्य प्रदेश सरकारने राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ जबलपूर युनिव्हर्सिटीचे नामकरण दुर्गावती विश्वविद्यालय असे केले. २४ जून १९८८ ला त्यांच्या पुण्य़तिथीनिमित्त भारत सरकार कडून एक पोस्टाचा स्टॅम्प काढून श्रद्धांजली वाहिली गेली.
🚆 राणीच्या नावावरून नामकरण झालेली जबलपूर जंक्शन व जम्मूतवी दरम्यान धावणारी ट्रेन दुर्गावती एक्सप्रेस (११४४९/११४५०) या नावाने प्रसिद्ध आहे.



🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

संकलित माहिती

गुरुवार, १७ जून, २०२१

गोपाळ गणेश आगरकर Gopal Ganesh Agarkar



गोपाळ गणेश आगरकर (समाज सुधारक) 
Gopal Ganesh Agarkar

जन्म : १४ जुलै १८५६ (टेंभू, तालुका-कराड , जि.सातारा)
मृत्यू : १७ जून १८९५ (पुणे, महाराष्ट्र)
चळवळ : समाजसुधारणा
पत्रकारिता/ लेखन : केसरी, सुधारक
धर्म : हिंदू
वडील : गणेश आगरकर
पत्नी : यशोदाबाई गोपाळ आगरकर

अपत्ये : यशवंत, माधव व २ मुली आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत गो.ग.आगरकर यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी,मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌- निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला. असा लेख लिहिण्याचे धारिष्ट्य त्यापूर्वी कोणाचे नव्हते. बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव प्राधान्याने घ्यावी लागते महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.

💠 आरंभीचा काळ
आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९ मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.

🌀 कारकीर्द
आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.
पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

🔮 उल्लेखनीय कार्य
१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली.
१८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले.
गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत.
आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.
राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला.
आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.
वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

📰✍️ पत्रकारिता
१८८१ मध्ये 'केसरी' हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.
आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

♨️ टिळकांशी मतभेद
आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे.
१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण.
अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.``
आगरकरांच्या लेखन कौशल्या संदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.``
यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६ मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,
``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेऊन संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत``
आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती.

🏢 संस्था
गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

📜 पुरस्कार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१०मध्ये हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना, तर २०१२साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला.

महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर पुरस्कार देते. २०१२साली हा पुरस्कार महेश म्हात्रे यांना मिळाला होता.

📚✍️ गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके -

आगरकर दर्शन

आगरकर-वाङ्मय. खंड १ ते ३. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे)

आगरकर विचार (लेखक : अशोक चौसाळकर, तानाजी ठोंबरे, डाॅ. भा.ल. भोळे)

आगरकर व्यक्ती आणि विचार (लेखक वि.स. खांडेकर)

आगरकरांचे राजकीय विचार (अशोक चौसाळकर, २००५)

गोपाळ गणेश आगरकर. लेखक, संपादक - प्रा. ग.प्र. प्रधान.

गोपाळ गणेश आगरकर - निवडक लेखसंग्रह. लेखक गो. ग. आगरकर. प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन

गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र (प्रा. अविनाश कोल्हे)

टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपादक : अशोक चौसाळकर)(२००८)

टिळक आणि आगरकर (नाटक). लेखक - विश्राम बेडेकर

डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस (लेखक गो.ग. आगरकर)

द्रष्टा (आगरकरांच्या आयुष्यावर व समाजकार्यावर लिहिलेले नाटक, लेखिका - माधुरी आठवले)

’विकार विलसित’ हे शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर : लेखक गो. ग. आगरकर.

वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण (लेखक गो.ग. आगरकर)

’वाक्य विश्लेषण’ हा व्याकरण ग्रंथ (लेखक गो.ग. आगरकर)

श्रेष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, 
लेखिका : कुसुम बेदरकर; 
प्रकाशक : अस्मिता प्रकाशन(पुणे); 
प्रकाशन तिथी : नोव्हेंबर २००९

’सुधारकातील निवडक निबंध’ लेखक गो.ग. आगरकर
 🇮🇳 जयहिंद🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏

संकलित माहिती

सोमवार, ७ जून, २०२१

जागतिक अन्न सुरक्षा दिन World Food Safety Day



7 जून जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून का साजरा केला जातो.
जागतिक अन्न सुरक्षा दिवस पोळी,कापड आणि घर या जीवनाच्या मूलभूत गोष्टी आहेत. या तिघांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. पण सर्वात जास्त गरज आहे तर अन्ना ची .जर तेच मिळाले नाही तर मनुष्य वेळीच आधी मरण पावेल. लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 जूनला अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी एक थीम देखील तयार केली जाते. मग जाणून घ्या हा खास दिवस का साजरा केला जातो? हेतू काय आहे आणि लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहेत.

जागतिक अन्न सुरक्षा दिन का साजरा केला जातो? 
हेतू काय आहे?
जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणजेच जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो. जरी काही वर्षांपासून तो 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात होता, परंतु आता तो 7 जून रोजी साजरा केला जातो. हे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने 2018 मध्ये हे सुरु केले होते.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना दूषित आहाराबद्दल जागरूक करणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी 4 लाख 20 हजार लोक केवळ दूषित अन्न खाल्यामुळे मरतात. यासह, मुले दूषित किंवा जीवाणूंनी भरलेल्या अन्नामुळे देखील मरतात. अहवालानुसार दरवर्षी सुमारे 1 लाख 25 हजार मुलांचा मृत्यू होतो..

जागतिक अन्न सुरक्षा दिन थीम 2021 -
यंदाच्या जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त थीम म्हणजे '‘स्वस्थ्य कल के लिए आज का भोजन सुरक्षित". याविषयी लोकांना अधिक जागरूक करावे लागेल. अन्यथा हे अनमोल आयुष्य काही वेळातच राखेत मिळेल.
जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम 2022-
 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' (Safer food, better health) अशी आहे. 
जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम 2023
'सकस आहार उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली ' अशी आहे.

सर्व लोक पोट भरण्यासाठी अमर्याद खात असतात, पण ज्या लोकांना जगण्या इतकं खायला भेटल ना तरी ते देणाऱ्याला देव मानत असतात.

एकच विनंती - ज्यांना जगण्या पूरतही अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी अन्नदान नक्की करा.

अन्नाच्या सुरक्षेची, दर्जाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. शरीरास अपायकारक असणाऱ्या अन्नाचे सेवन टाळा.

कायम निरोगी अन्नाचे सेवन करा व वाया जाऊ देऊ नका. पोटभर खा आणि मस्त राहा...

सकस आहार वाही जिवनाचा भार !

प्रत्येक व्यक्तींला ताजे,स्वच्छ,सकस आणी पोष्टिक अन्न मिळणे हा त्याचा हक्क आहे.
आपल्या कडे मुंबईत अनेक ठिकाणी उघड्यावरच अन्नपदार्थ विकले जातात हातगाडीवर व हॉटेल्स मध्ये तळलेले पदार्थ उघड्यावरच ठेवले जातात.काही ठिकाणी नाल्याच्या बाजूलाच चहा विक्री केली जाते.तसेच अनेक हॉटेल्स मध्ये भजी पोहे, जिलेबी, उघड्यावरच ठेवले जातात. वडापाव सेंटरवरही मोठ्या परातीमध्ये वडापाव ठेवले जात असून, त्यावर कोणतेही झाकण नसते. रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर या वडापाववर बसतो. पाणीपुरीचे सर्व पदार्थ उघड्यावरच असतात आणी पाणीपुरी खाण्यासाठी जी प्लेट वापरण्यात येते ती प्लेट तेथेच घाण पाण्यात धुतली जाते व सर्वांनी हात पुसलेल्या छोट्या टॉवेलनेच ती प्लेट पुन्हा पुसली जाते,
अनेक हॅाटेल मध्यील किचन तर इतके घाण आणी कळकटलेले असते की ते किचन पाहीले तरी माणसाला ओकारी येईल. थोडक्यात काय तर माणसाने बाहेरच अन्न खायचे ठरवले तर त्याला स्वच्छ, ताजे, सकस, पोष्टिक अन्न मिळणे खुपच दुरापस्त आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या म्हणण्यानुसार दरवर्षी दहा पैकी एक व्यक्ती दूषित अन्न किंवा बॅक्टेरिया युक्त खाद्य पदार्थ खाल्या मुळे आजारी पडते. जगातील लोकसंख्येनुसार हा आकडा साठ कोटीच्या पुढे गेला आहे.
जागतिक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये दरवर्षी दूषितअन्न खाल्यामुळे आजारी पडून अंदाजे तिस लाख लोकांचा मृत्यू होतो.
सुरक्षित आणि पौष्टिक आहाराचा वापर करूनच जीवन निरोगी ठेवण्यासाठीच या दिनाचे खूप महत्त्व आहे.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जन जागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदर कमी करणे.
संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या दोन संस्था अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization- FAO) आणि जागतिक आरोग्य संघटन (World Health Organization- WHO)ला जगभरातील अन्न सुरक्षेला चालना देण्यासाठी नियुक्त केल्या आहे.

अन्न सुरक्षा का आवश्यक आहे आणि ती कशी मिळवता येऊ शकते? या वर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहे.
 त्याचे 5 मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
१) सरकारने सर्वांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक जेवण सुनिश्चित केले पाहिजे.
२) कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये चांगल्या पद्धती राबविण्याची गरज आहे.
३) व्यावसायिकाने अन्न पदार्थ सुरक्षित असल्याची खात्री द्यावी.
४) सर्व ग्राहकांना सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिक आहार मिळविण्याचा हक्क आहे.
५) अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याचबरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.

■ शासकीय उपक्रम -
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात पहिले राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स (State Food Safety Index-SFSI) विकसित केले आहेत.
या निर्देशकांच्या माध्यमाने अन्न सुरक्षेच्या पाच निकषांवरील राज्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. या श्रेणीमध्ये खालील निकषांचा समावेश आहे.
मानव संसाधन आणि संस्थात्मक व्यवस्थापन अंमलबजावणी, अन्न चाचणी पायाभूत सुविधा आणि देखरेख
◆ प्रशिक्षण आणि क्षमता वाढविणे
◆ ग्राहक सशक्तीकरण
◆ एका अभिनव आणि बॅटरीने चालणारे रमन 1.0 नावाच्या डिव्हाईस ला बाजारपेठेत आणले आहेत. हे डिव्हाईस एका मिनिटापेक्षा कमी वेळेत खाद्य तेल, चरबी आणि तुपामधील केलेली भेसळ शोधण्यात सक्षम आहे.
◆ शाळांकडे अन्न सुरक्षेचा मुद्दा नेण्यासाठी ‘फूड सेफ्टी मॅजिक बॉक्स’ नावाच्या नव्या समाधानाची सुरुवात केली गेली आहे.
◆ या किट मध्ये स्वतःच अन्न मध्ये भेसळ असल्याची तपासणी करण्यासाठी मॅन्युअल आणि एक डिव्हाईस लागले आहे.
◆ FSSAI ने विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यस्थळे, संरक्षण आणि अर्ध-सैन्य प्रतिष्ठान, रुग्णालये, आणि कारागृह सारख्या 7 संकुलांना 'ईट राइट कॅम्पस' म्हणून घोषित केले आहे.
◆ FSSAI ने अन्न कंपन्या आणि व्यक्तींचे योगदानाला ओळख देण्यासाठी ‘ईट राइट अवार्ड’ ची स्थापना केली आहे. जेणे करून नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यासाठी अन्न निवडण्यामध्ये सशक्त बनवणे.
अन्नपदार्थ विक्रेत्यांनी काय काळजी घ्यावी ?
1)अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियमानुसार परवाना घेऊनच अन्न पदार्थाची विक्री करावी.
2)असुरक्षित, नकली अशा अन्नपदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री करू नये. अन्न पदार्थत कुठलीच भेसळ करू नये
3)संर्गजन्य व रोगपीडित व्यक्तीस कामावर ठेवू नये.
4) विक्रीसाठी ठेवलेले अन्नपदार्थ झाकून ठेवावे.
5)अन्नपदार्थ ठेवण्यासाठीची भांडी गंजमुक्त आवरण असलेली असावीत.
6)अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी कीटक नियंत्रण प्रणालीचा वापर करावा.
7)पिण्याचे पाणी निर्जंतुक केलेले असावे.
8)दुध व दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक योग्य त्या तापमानात करावी.
9) वैधता दिनांक संपलेल्या गोष्टी ग्राहकांला विकु नयेत.





संकलित माहिती


रविवार, ६ जून, २०२१

६ जून- राज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 

 
६ जून १६७४

        छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.

दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

         राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासद बखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

👁️ *शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून…..

हेन्री ऑक्सएन्डन (HENRY OXENDEN)च्या डायरीतील माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. या हेन्री ने राज्याभिषेक सोहळा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वर्णनात्मक माहिती आपल्या डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

हेन्री ने असे नमूद केले आहे कि, राज्याभिषेक सोहळा हा *दिनांक ३० मे १६७४ रोजी सुरु केला गेला आणि दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला.* या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.

🚩 ३० मे १६७४: हेन्री, जेधे शकावली, शिवापूर शकावली आणि समकालीन साधनांत नमूद केले आहे कि, या दिवशी हा सोहळा रायगडावर सुरु झाला. दिनांक ३० मे १६७४ रोजी शिवरायांनी वैदिक पद्धतीनुसार आपल्या सर्व राण्यांशी पुन्हा विवाह केला (ज्या राण्या हयात होत्या त्यांच्याशीच). सोबतच शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे गणेश पूजन तसेच पुण्यावाचन असे विधिवत कार्य संपन्न झाले.

🚩 ३१ मे १६७४: या दिवशी ऐंद्रीशांती विधी आणि ऐशानयाग असे विधी पार पडले.

🚩 १ जून १६७४: या दिवशी रायगडावर ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम असे विधी करण्यात आले.

🚩 २ जून १६७४: २ जून १६७४ म्हणजेच हिंदू कालगणनेप्रमाणे मंगळवार, ज्येष्ठ शुद्ध नवमी असा दिवस होता आणि शिवराज्याभिषेक प्रयोगात नमूद केल्याप्रमाणे या दिवशी राज्याभिषेकाशी संबंधित कोणतेही विधी करणे योग्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही विधी-संस्कार झाले नाहीत.

🚩 ३ जून १६७४: शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे या दिवशी नक्षत्रयज्ञ संपन्न झाला.

🚩 ४ जून १६७४: निवृत्तीयाग हा विधी या दिवशी करण्यात आला.

🚩🤴🏻 ५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)

दिनांक ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे भोसले यांचा स्वराज्याचे राजे म्हणून, सोयराराणी साहेब यांचा स्वराज्याच्या महाराणी आणि संभाजी भोसले यांचा स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. अनेक सुवासिनींनी त्यांना ओवाळले, अनेक उदकांनी पती-पत्नी दोघांवर अभिसिंचन केले गेले आणि पुन्हा एकदा महाराजांनी स्नान संपन्न केले, वस्त्रालंकार केला आणि धनुर्धारणा करून शिवराय रथारोहणासाठी सज्ज झाले आणि नंतर हत्तीवर बसून त्यांनी मंदिरालाही भेट दिली.

हे सगळे सोहळे, विधी, संस्कार संपन्न झाल्यावर अखेर दिनांक ६ जून १६७४ पहाटे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ सूर्योदयाच्या ३ घटिका पूर्व शिवाजी महाराज, सोयराराणी साहेब आणि शंभूराजे आपल्या सिंहासनावर आरूढ झाले. संपूर्ण दरबार शिवरायांना वाकून सलाम आणि नजराणे देत होते आणि सर्वांचा उर अभिमानाने भरून आला होता, डोळ्यांतील अश्रूंमुळे सर्वांच्या डोळ्यापुढील दृश्ये पुसट झाली होती. इतिहासातील एक अभूतपूर्व सोनेरी सोहळा संपन्न झाला होता आणि जिजाऊंच्या छायेत वाढलेला, मावळ्यांमध्ये मस्ती करून, खेळ खेळून स्वराज्याची स्वप्ने स्वतः सोबत त्यांच्याही मनात जागविणारा, रयतेचा प्रेमळ, कनवाळू आणि आपल्या सर्वांचा लाडका शिवबा या दिवशी ‘श्रीमान श्रीमंत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज’ झाले होते.

*शिवराज्याभिषेकाची गरज का होती ? त्याचे काय परिणाम झाले ?*

                             हेन्री हा इंग्रज अधिकारी आपल्या डायरीत नमूद करतो कि, “मी पाहतोय राजे आपल्या भव्य सिंहासनावर आरूढ झाले होते. त्यांच्याजवळ मूल्यवान पोशाख केलेले संभाजीराजे, पेशवा, प्रधान व अनेक ब्राह्मण उभे होते. आम्ही (हेन्री यांनी) आणलेला नजराणा देण्यासाठी नारोजी पंडितांनी आम्हाला पुढे केले व शिवरायांनी आम्हाला सिंहासनाच्या पायरीशी येण्याचा हुकूम केला आणि आम्ही जाताच आम्हाला पोशाख देऊन रजा दिली.

त्या सिंहासनावरील खांबांवर मुसलमान पद्धतीची अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे आम्ही पहिली. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत एक सोन्याच्या तराजूची परडी न्यायचिन्ह म्हणून शोभत होती. गडावरील राजवाड्याच्या बाहेर आम्ही पाहतो तर दोन हत्ती उभे केले होते आणि दोन पांढरे शुभ्र घोडे देखील उभे होते. गडाची वाट इतकी बिकट असतांना हे हत्तीसारखे विशाल प्राणी गडावर कसे आणले असावेत हा प्रश्न आम्हाला पडला आहे.”           

   🚩 *हर हर महादेव....!* 🚩                                                                                                                                                                                                   

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

स्त्रोतपर माहिती

मंगळवार, १ जून, २०२१

जागतिक दूध दिवस

जागतिक दूध दिवस



सर्वांना दूध आणि दुग्ध उत्पादनाचे महत्त्व कळावे म्हणून आज म्हणजेच १ जूनला ' जागतिक दूध दिवस ' साजरा करतात. सर्वसामान्य नागरिकांना दूधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यानात यावे यासाठी हा दिवस!
  फुड ॲन्‍ड ॲग्रीकल्‍चर ऑर्गनायझेशन, युनायटेड स्‍टेटस् व त्‍यांच्याशी संलग्‍न १९१ सभासद देशांनी माणसाला आवश्‍यक न्‍युट्रीशनल उपलब्‍धता वाढवण्यासाठी दुधाकडे लक्ष केंद्रित केले. 
अनेक देशांमध्ये याच तारखेला दुग्ध दिवस साजरा केला जात असे म्हणून २००१ पासून १ जूनला जागतिक दूध दिवस साजरा करण्यात येतो.

जागतिक दूध दिवस ...

मजबूत दात –

दूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. कॅल्शियम आपल्या शरीरात शोसल्या जाईल जेव्हा आपल्या शरीरात विटामिन – डी असेल यासाठी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा कि दुधात विटामिन – डी चे प्रमाण चांगले असते.

स्वस्थ हाडे –

हे खरेच कि मुलांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी त्यांना दूध पिणे जरुरी आहे. तेव्हाच त्याचा योग्य विकास होऊ शकणार हे पण सत्य आहे कि तरुण लोक सुद्धा दूध सेवन करून आपल्या हाडांना मजबूत बनवू शकतात. मग दुधातील फायदे त्यातील कॅल्शियम मुळेच असतात आणि यासाठी शरीरात विटामीन – डी ची जरुरत असते.

स्नायूंचा विकास –

स्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. हा फायदा दुधात असलेल्या प्रोटीनमुळे होतो. बरेच धावपटू व्यायाम केल्यावर दूध पिणे पसंत करतात.यामुळे शरीराला आवश्यक पोषके मिळतात आणि त्यांच्या स्नायूंचा विकास अधिक होतो. स्नायुमधील वेदनाही यामुळे दूर करण्यात मदत मिळते.

तुम्ही आता निश्चितपणे जाणला असाल कि दूध पिल्याने काय काय फायदे होतात जरी तुम्ही थोड थोड दूध पीत असाल परंतु ते नक्कीच प्या. हे काही महत्वाचे नाही कि तुम्ही रोज किती दूध पिता मग ते थंड असो व गरम या दोन्ही प्रकारच्या दुधापासून सारखेच फायदे मिळतात.

दूधामध्ये मानवी शरीरास पोषख असे अनेक घटक असतात. ते खालील प्रमाणे

कॅल्शियम, मॅगनिशियम, झिंक, फॉस्फरस,

आयोडीन,आयर्न,पोटॅशियम,फोलेट्स,

व्हिटॅमिन ए ,व्हिटॅमिन डी, राइबोफ्लेविन,

व्हिटॅमिन बी12, प्रोटीन,आरोग्यदाई फॅट,

दूधात कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडांच्या खनिजांची घनता सुधारण्यासाठी ओळखला जातो. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फॉस्फरस देखील असतात, हे सर्व चांगल्या हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. दूध हा अधिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. दूध प्यायल्याने मानवी शरीरात कमी वेळात जास्त उर्जा उत्पन्न होऊ शकते. कारण, दुधात अधिक मात्रेत प्रोटीन असते. जगभरातील अनेक देश दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही धवलक्रांती म्हणजेच दूध वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात…

दूधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. रक्तदाब नियंत्रित असल्याने हृदयावर ताण येत नाही त्यामुळे हृदयासंबंधीत कोणत्याही समस्या उद्भवत नाही. हृदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी झोपताना दूध पिणे कधीही चांगले.

दूध पिण्यामुळे त्वचे संबंधीतील समस्या दूर ठेवण्यास मदत होते. दूध हे त्वचेला कोमल, मुलायम आणि चमकदार बनवतो. दूधामध्ये त्वचेसाठीचे उपयुक्त असे सर्व विटामीन्स आणि पोषकतत्वे असतात. त्यामुळे दिवसातून दोन ग्लास दूधाचे सेवन करणे गरजेचे आहे.

स्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. अनेक धावपटू व्यायाम केल्यानंतर दूध पिणे पसंत करतात त्यामुळे स्नायूंना पोषक तत्वे मिळतात. दूध पिण्याने स्नायुमधील वेदनाही दूर होते.

रात्री दूध प्यायल्यामुळे त्वचेसाठी बरेच फायदे होऊ शकतात. नियमितपणे दुधाचे सेवन केल्याने त्वचेला एक तरुण देखावा मिळू शकतो. दुधात व्हिटॅमिन बी 12 असते जे त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत करते. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन ए नवीन पेशी रचना तयार करण्यास मदत करते आणि त्वचेच्या विविध आजारांशी लढायला मदत करते.

मधुमेह रूग्णांच्या हाडांमध्ये अशक्तपणा असतो, ज्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवतो. त्यांच्यासाठी, रात्री साखर न घालता अर्धा कप दूध पिणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

रात्री थोडी हळद घालून तयार केलेले कोमट दूध पिणे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दूर करण्यासाठी फायदेशीर नैसर्गिक उपाय ठरू शकतात. हळद-दुधाचे अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

वजन कमी करण्याची चिंता न करता फक्त एक कप गरम दूध पिणे फायदेशीर आहे. दूध हे प्रथिनांचे स्रोत आहे जे रक्तातील साखरेचे योग्य स्तर राखण्यात आणि उर्जेची पातळी कमी करण्यास मदत करते. क्रीमपेक्षा कमी फॅट (फॅट) असलेले दूध अधिक प्रभावी आहे

आगामी झालेले