नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

केशवराव जेधे

केशवराव मारूती जेधे
टोपणनाव: तात्यासाहेब
जन्म: २१ एप्रिल, इ.स. १८९६ पुणे
मृत्यू: नोव्हेंबर १२, १९५९ पुणे
चळवळ: हिंदू बहुजन उद्धार
संघटना: ब्राह्मणेतर पक्ष
पत्रकारिता/ लेखन: शिवस्मारक
धर्म: हिंदू
प्रभाव: शाहू महाराज
केशवराव यांनी शेतकरी, कामगार, श्रमकरी वर्गासाठी मोलाचे योगदान दिले. अशा या निःस्वार्थी, सत्यशोधकी, झुंजार, निर्भिड, कर्तृत्ववान, अभ्यासू लोकनेत्याला वंदन.
 केशवराव जेधे हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते.  केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते. केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. पुणे येथील जेधे मॅन्शन हे या चळवळीचे केंद्र होते. केशवरावांनी शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली. केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळावा काढून टिळकांच्या शिवजयंतीला आव्हान दिले होते. त्यांनी "शांतीचा गांधी पुतळा।देशा प्यारा जाहला।" ही कविता लिहली.

 केशवराव जेधे यांना एकूण चार बंधू होते. केशवराव सर्वात धाकटे. त्यामुळे मोठ्या तिघांचेही लाडके. त्यांनी घरातले अर्थकारण पाहायचे व केशवरावांनी लष्कराच्या भाकरी भाजायच्या, असे त्यांच्या शालेय वयातच ठरून गेले होते. बाबूराव जेधे हे बंधू पुण्याच्या समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यांच्यापासूनच केशवरावांनी दीक्षा घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयात इंटरपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर केशवराव खऱ्या अर्थाने कार्यरत झाले.

महात्मा फुले यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली. समाजातील विषमतेवर त्यांचा पहिल्यापासून रोष होता. ती कशामुळे आली, याचा अभ्यास करतानाच त्यांना तत्कालीन सवर्णांच्या अन्य समाजावर असलेल्या धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व जाणवले. ते कमी व्हावे, यासाठी काय करता येईल यादृष्टीने ते विचार करू लागले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सुरू केलेल्या विचारांना वेगळे वळण लागून तत्कालीन महाराष्ट्रात एक वेगळाच वाद सुरू झाला. बहूजन व अभिजन असे त्या वादाचे काहीसे स्वरूप होते. दिनकरराव जवळकर यांच्या मार्गदर्शनात केशवरावांची जडणघडण झाली.

केशवराव त्यात हिरीरीने पडले व कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे अल्वावधीतच बहुजनांचे नेते म्हणून पुढे आले. त्यावेळच्या पुण्याच्या काँग्रेसमध्ये उच्चवर्णीयांचाच भरणा होता. काकासाहेब गाडगीळ हे त्यांचे धुरीण. काँग्रेसला तळापर्यंत न्यायचे तर बहुजनांचा त्यात सहभाग झाल्याशिवाय ते शक्य नाही, हे काकासाहेबांनी बरोबर ओळखले. त्यांनीच केशवरावांना आपली, काँग्रेसची, देशाच्या स्वातंत्र्याची भूमिका पटवून दिली. बहुजनांसाठी बराच संघर्ष केला, मात्र सत्तेच्या किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याशिवाय त्यांच्यासाठी काहीच करणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर केशवरावांनीही फारसे आढेवेढे न घेता काँग्रेसप्रवेश केला. त्यांच्या या एका निर्णयामुळे तोपर्यंत राज्यात अन्य विचारांच्या तुलनेत बरीचशी पिछाडीवर असलेली काँग्रेस बहुजनांची काँग्रेस म्हणून पुढे आली. केशवराव बरीच वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. स्वातंत्र्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली. आपल्या देशाला संविधान असावे, यासाठी घटना समिती स्थापन झाली. त्या घटना समितीवर केशवराव जेधे सदस्य होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढे काँग्रेस अंतर्गत मतभेदाला कंटाळून केशवराव कॉंग्रेसमधून बाहेर पडले.केशवरावांचे ठामपण खुद्द कॉंग्रेसमध्येही कॉंग्रेसला गांधीवादापासून डावीकडे ओढणाऱ्या शक्ती कार्यरत होत्या. विशेष म्हणजे कॉ. एम.एन. रॉय यांच्यासारख्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा नेताही भुरळ पाडून तेच कार्य करीत होता. केशवरावांच्या कणखर नेतृत्वामुळे ही प्रक्रिया फार पुढे जाऊ शकली नाही. कुंडल येथील एक सभेचे अध्यक्ष असलेले रॉयसाहेब गांधीवादी भूमिका मांडू पाहणाऱ्या वि. स. पागे या तरुणाला मनाई करू लागले, तेव्हा केशवरावांनी ‘तुम्ही सभेचे अध्यक्ष असला तरी मी महाराष्ट्र कॉंग्रेसचा अध्यक्ष आहे,’ असे रॉय यांना खडसावत पागे यांना बोलू दिले.

पण मुळातच चळवळ्या असलेल्या केशवरावांचे मन काही सत्तेत रमेना. काँग्रेसमधील राजकीय उलाढालींना कंटाळून त्यांनी आणखी काही सहका-यांना बरोबर घेत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. जेधे-मोरे, जेधे-जवळकर, जेधे-गाडगीळ अशा ब-याच जोड्या त्यावेळी राज्यात गाजल्या, याचे कारण केशवरावांचा सहृदय स्वभाव हेच होते. मैत्री, प्रेम, आपुलकी यांना त्यांच्या लेखी फार महत्त्व होते. आपल्या विचारांशीही ते कायम प्रामाणिक असत. त्यामुळेच आचार्य अत्रे यांनी ज्यावेळी महात्मा फुले यांच्यावर चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केले, त्यावेळी काहीही न बोलता केशवरावांनी त्यांना आर्थिक मदत केली. स्वत: अत्रे यांनीच त्याचा उल्लेख केला आहे.

केशवरावांमुळे पुण्याच्या बंदिवान मारुतीजवळच्या त्यांच्या ‘जेधे मॅन्शन’ला त्या काळात अतोनात महत्त्व प्राप्त झाले. महात्मा गांधी यांच्यापासून पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या तत्कालीन अनेक नेत्यांचा या मॅन्शनमध्ये पाहुणचार झाला आहे. साचलेल्या तळ्यासारखे नव्हे, तर वाहत्या गंगेसारखे त्यांचे जीवन होते. त्यामुळे त्यांना प्रसंगी प्रवादही सहन करावे लागले आहेत. समाजाचे कार्य करण्यासाठी जेधे यांनी ‘मजूर,’ ‘कैवारी’ अशी वृत्तपत्रेही चालविली. ‘देशाचे दुष्मन’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक आक्षेपार्ह ठरून त्यांना सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षेचा खटला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला व जेधेंना दोषमुक्त ठरविले. पुणे येथे छत्रपती मेळा त्यांनी काढला होता. महापालिकेच्या आवारात आता असलेला महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीही त्यांनी बरेच काही केले. पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय जेधे यांना द्यावे लागेल. त्यांनी देशाचे दुश्मन (१९२५) हे पुस्तक लिहिले. त्याबद्दल त्यांच्यावर फिर्याद करण्यात आली; पण ते अपिलात निर्दोषी ठरले. अस्पृश्यांच्या अनेक चळवळींत त्यांनी भाग घेतला. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते (१९२८). पुण्याच्या हरिजन सेवक संघाचे ते अध्यक्ष होते (१९३३). १९३० पासून त्यांनी काँग्रेसच्या विविध सत्याग्रहांत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाल्या. १९३५ मध्ये ते मध्यवर्ती कायदे मंडळात निवडून आले. १९४२ च्या लढ्यात त्यांना वीस महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. १९३८ व १९४६–४८ च्या काळात ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेसमधील मतभेदांमुळे ते शेतकारी-कामगार पक्षात गेले (१९४८–५३); पण पुढे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. १९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसतर्फे निवडून आले. तत्पूर्वी त्यांनी दोन महत्त्वाच्या चळवळींत भाग घेतला : गोव्याचे मुक्ती आंदोलन (१९५५) व संयुक्त महाराष्ट्र चळवळ (१९५६).

राजकारणात असूनही त्यांनी वृत्तपत्रकार या नात्याने विपुल स्फुटलेखन केले. महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते (१९४८). मुंबईच्या सत्याग्रहावर त्यांनी एक पोवाडा रचला (१९३१) व त्या काळी तो फार गाजला होता. त्यांनी १९२१ मध्ये शितोळे घराण्यातील वेणुताई यांच्याशी विवाह केला. हाडाचे कार्यकर्ते व दलितांचे उद्धारक म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतून काँग्रेसचा जो प्रचार व प्रसार झाला, त्याचे श्रेय जेध्यांना देण्यात येते. 

 संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५७ च्या मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका लढवण्याचे ठरवले. या निवडणुकीत काँग्रेसने केशवराव जेधेंना बारामती मतदारसंघातून तिकीट दिले. आबासाहेब शितोळे यांना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले. याशिवाय मालतीबाई तेंडुलकर याही रिंगणात होत्या. या तिहेरी लढतीत केशवरावांची सरशी झाली आणि ते बारामती मतदारसंघाचे पहिले खासदार ठरले. 

सार्वजनिक जीवनात त्यांनी पुणे महापालिकेचे सभासद, मध्यवर्ती कायदे मंडळाचे सभासद (१९३५), द्वैभाषिक महाराष्ट्र-गुजराथच्या विधिमंडळाचे सभासद (१९५७), महाराष्ट्र प्रांतिक कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष (१९३८, १९४६-४८), संयुक्‍त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष (१९५५) आदी पदे भूषवली.

केशवराव जेधे सामाजिक सुधारणेच्या चळवळीत दाखल झाले ते वैयक्तिक स्वार्थ किंवा प्रतिष्ठा यासाठी नाही. त्यांना आपल्या बहुजन समाजाचे खरेखुरे हित व्हावे, असे वाटत होते. त्यांची जी काही राजकीय कृती होत असे त्यात फक्त हाच विचार असे. अखेरपर्यंत ते सामाजिक जीवनात कार्यरत होते. अखेरच्या काळात त्यांचा जयंतराव टिळक यांच्याशी बराच स्नेह जुळला. सर्वपक्षीय गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले अध्यक्ष तेच होते. आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारवाडा येथे १२ नोव्हेंबर १९५९ रोजी झालेल्या सभेत भाषण करताना अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. या थोर व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.                                                        

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳   

   🙏 विनम्र अभिवादन 🙏

 स्त्रोतपर माहिती

आगामी झालेले